गुरांच्या गोठ्याला भीषण आग, अडीच लाखांचे नुकसान

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील सावखेडा सिम येथे गुरांच्या गोठ्याला आग लागून सुमारे अडीच लाखांचे शेती साहित्य जळून खाक झाले आहे. लागलेल्या आगीत शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.

यावल तालुक्यातील सावखेडा सिम येथील बिस्मिल्ला नबाब तडवी यांच्या शेतात असलेल्या गुरांच्या गोठ्यात सोमवारी २४ फेब्रुवारी रोजी दुपारी २.३० वाजता अचानक आग लागली. या आगीत शेती उपयोगी अवजारे, मटेरियल, पत्र्यांचे शेड, रासायनिक खताच्या ३० गोण्या, ठिबक नळ्या २५ बंडल, सुप्रीम पाईप ५२ नग, सुप्रीम पाईप अळीचे ७५ नग, दोन पंप फवारणी, स्टार्टर २, पाण्याची टाकी १००० लिटरची जाडी असे एकूण अडीच लाखांचे नुकसान झाले आहे.

आगीच्या घटनेनंतर तलाठी निशांत मोहोळ यांनी पंचनामा केला. यावेळी दहिगावचे तलाठी मिलिंद कुरकुरे, पोलीस पाटील पंकज बडगुजर, सामाजिक कार्यकर्ते अनिल बडगुजर, सेवानिवृत्त फौजी हुसेन तडवी यांच्यासह अनेकांनी आग विझवण्यासाठी परिश्रम घेतले. यावल नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या गाडीला तात्काळ बोलावण्यात आले होते. मात्र, तोपर्यंत सर्व साहित्य जळून खाक झाले होते.

बिस्मिल्ला तडवी यांनी २१ फेब्रुवारी रोजी पीव्हीसी पाईप्स आणले होते. आग अचानक कशी लागली याबाबत ग्रामस्थांमध्ये चर्चा सुरू आहे. आदिवासी बांधवांनी आगीचे नुकसान त्वरित भरून देण्याची मागणी केली आहे. माजी पोलीस पाटील यांनी देखील प्रशासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

Protected Content