पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी। सध्या संपूर्ण राज्यासह पाचोरा शहरातही तापमानाचा पारा कमालीचा वाढला असून, या भीषण उष्णतेने एका निष्पाप विक्रेत्याचा बळी घेतला आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात फळे विक्रीचा व्यवसाय करणारे आनंद नथू भोई (वय ३२, रा. बाहेरपुरा) यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कडक उन्हात दिवसभर थांबून व्यवसाय करावा लागत असल्याने त्यांना उष्णतेचा तीव्र त्रास जाणवू लागला होता. उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली, ज्यामुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक झाले आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, दुपारच्या वेळी उन्हाची तीव्रता अधिक असल्याने गरज नसेल तर घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ देऊ नका, डोक्याला रुमाल किंवा टोपीचा वापर करा आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आनंद भोई यांच्या निधनामुळे बाहेरपुरा परिसरात शोककळा पसरली असून, वाढत्या उन्हाची तीव्रता बघता सर्वत्र मधुर खानदेश वृत्तपत्राच्या माध्यमातून काळजी घेणे बाबत आव्हान करण्यात आले आहे.



