चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील ग्रामीण भागात सोमवारी २६ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास अचानकपणे झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे रब्बी पिकांचे प्रचंड प्रमाणावर नुकसान झाल्याचे समोर आले आहे. शासनाने तातडीने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून अहवाल शासनाकडे पाठवावा व शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी वर्ग कडून केली जात आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील तांबोळे बू ,तांबोळे खू, पिंप्री, चितेगाव, वलठाण,गणेशपुर, निमखेडी, बोढरे, पाटणा यासह इतर गावातील परिसरात सोमवारी २६ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता अचानकपणे वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यामुळे गावांमधील शिवारातील शेतामधील गहू, हरभरा, मक्का व इतर रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान मंगळवार २७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता तहसीलदार प्रशांत पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणीला सुरुवात केली आहे. तहसीलदार प्रशांत पाटील यांनी गाव शिवारात व शेतात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत नुकसानीबाबत चर्चा केली. तहसीलदार प्रशांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना पंचनामा करण्याच्या सूचना देण्यात आले आहे तर शेतकऱ्यांना धीर देत तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत मिळवण्यासाठी शासन दरबारी अहवाल पाठवू असे आश्वासन त्यांनी दिले.