फडणविसांनी रवी राणांना आवर घालावा : ना. गुलाबराव पाटील

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एका आमदारावर केलेला आरोप हा सर्वांवर होत असल्याने देवेंद्र फडणवीसांनी रवी राणा यांना आवर घालावा अशी अपेक्षा आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली आहे.

 

सध्या राज्याच्या राजकारणात बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात शाब्दीक युध्दाचा भडका उडाला आहे. राणा यांनी थेट बच्चू कडूंनी खोके घेऊनच शिंदे सरकारला पाठींबा दिल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे सरकारमध्ये अस्वस्थता पसरल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी समज देऊन देखील हे दोन्ही नेते थांबण्यास तयार नसल्याचे आजचे चित्र आहे.

नेमक्या याच मुद्यावरून राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की, रवी राणा यांनी एका आमदारावर आरोप केले असले तरी यामुळे सर्वच्या सर्व ५० आमदारांबाबत संशयकल्लोळ निर्माण झालेला आहे. यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रवी राणा यांना योग्य ती समज द्यावी अशी अपेक्षा ना. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली.

Protected Content