मंदीचा सामना करण्याच्या सरकारी प्रयत्नांना यश – दास

shashikant das

 

मुंबई प्रतिनिधी । अर्थव्यवस्थेतील मंदीच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले की, मंदीचा सामना करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून या प्रयत्नांना यश येऊ लागले आहे. ‘आरबीआय’ने केलेल्या सर्व्हेनुसार १ हजार ५३९ कंपन्यांच्या ताळेबंदात गुंतवणुकीचा ओघ वाढत असल्याचे दिसून आले आहे. टाईम्स नेटवर्कने सोमवारी आयोजित केलेल्या ‘इंडिया इकोनॉमिक कॉन्क्लेव्ह’मध्ये ते बोलत होते.

ते म्हणाले की, विशेषतः कारखाना उत्पादनातील कंपन्यांनी ‘फिक्स्ड असेट’मधील गुंतवणूक वाढवली आहे. त्यांच्याकडील ४५.६ टक्के निधी हा फिक्स्ड असेटमध्ये गुंतवण्यात आला आहे. मागील वर्षी हेच प्रमाण १८.१९ टक्के होते. मात्र गुंतवणूक नेमकी किती वाढली, याबाबत ठोस अंदाज व्यक्त करणे घाईचे ठरेल, असे दास यांनी स्पष्ट केले. ताळेबंद पूर्ण होण्यापूर्वी अनेक कंपन्यांकडे अतिरिक्त निधी असल्याचे सर्व्हेत आढळून आले आहे. भांडवली गुंतवणूक वाढवण्यासाठी उपाययोजनांची आवशक्यता आहे. आर्थिक विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी जेव्हा जेव्हा गरज भासेल तेव्हा रिझर्व्ह बँक हस्तक्षेप करेल, असे गव्हर्नर दास यांनी यावेळी आशवस्त केले.

Protected Content