दानापुर-पुणे आणि झेलम एक्सप्रेसला रावेरला थांबा द्या; रेल्वे विभागाला निवेदन

रावेर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरील महत्त्वाचे रेल्वे स्थानक असूनही, रावेरला पुण्याकडे जाणाऱ्या दानापूर-पुणे एक्सप्रेस आणि जम्मूतवी-पुणे झेलम एक्सप्रेस या गाड्यांचा थांबा नसल्याने येथील प्रवाशांना मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे. केळ्याच्या उत्पादनात अग्रेसर असलेल्या या तालुक्यातून दररोज मोठ्या प्रमाणात केळी उत्तर भारतात रेल्वेने पाठवली जात असल्याने रेल्वेला चांगला महसूल मिळतो. मात्र, प्रवाशांना पुण्याला जाण्यासाठी बसवर अवलंबून राहावे लागत आहे.

रावेरमधून शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि उपचारांसाठी दररोज सुमारे १२०० ते १५०० प्रवासी पुण्याकडे प्रवास करतात. सध्या त्यांना खासगी बस आणि केवळ दोन एसटी बसचा आधार घ्यावा लागतो. यामुळे प्रवाशांना ९०० ते १००० रुपयांपर्यंतचा खर्च आणि वेळेचा अपव्यय सहन करावा लागतो. याचा थेट फायदा खासगी बस चालकांना मिळत असून ते दररोज १० लाखांहून अधिकची कमाई करत आहेत, तर रेल्वे संभाव्य मोठ्या महसुलापासून वंचित राहत आहे.

याव्यतिरिक्त, पूर्वी सुरू असलेली इटारसी-भुसावळ पॅसेंजर ट्रेन बंद झाल्याने सकाळी भुसावळ आणि जळगावकडे जाणाऱ्या प्रवाशांनाही अडचणी येत आहेत. सध्या धावणारी इटारसी-भुसावळ मेमो एक्सप्रेस मध्यरात्री ००:२५ वाजता असल्याने ती प्रवाशांसाठी सोयीस्कर नाही. त्यामुळे पूर्वीप्रमाणे सकाळी ७ ते ८ दरम्यान ही गाडी पुन्हा सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.

या गंभीर समस्येच्या पार्श्वभूमीवर रावेरमधील विविध संस्था, संघटना आणि प्रवासी वर्गाच्या वतीने रेल्वे प्रशासनाला लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे. प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी आणि त्यांच्या सोयीसाठी दानापूर-पुणे एक्सप्रेस आणि जम्मूतवी-पुणे झेलम एक्सप्रेस या दोन्ही गाड्यांना रावेर स्थानकावर थांबा मंजूर करण्याची मागणी दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्थेच्या रजनीकांत बारी, संजय बुवा, पवन शिरनाणे, विजय बारी, पुंडलिक महाजन, प्रवीण बारी आणि दिव्यांग संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भुसावळचे मंडळ रेल्वे प्रबंधक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.