बिलासपूर वृत्तसंस्था । महिलांवरील अत्याचार या अत्यंत संवेदनशील मुद्यावर छत्तीसगड महिला आयोगाच्या अध्यक्षा करणमयी नाईक यांनी केलेले एक वक्तव्य वादाच्या भोवर्यात सापडले आहे.
छत्तीसगढ राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा किरणमयी नाईक यांनी केलेल्या विधानांवरून वाद निर्माण झाला आहे. बहुतांश मुली आधी स्वतःहून संबंध ठेवतात आणि ब्रेकअपनंतर पुरुषांवर बलात्कार केल्याचा आरोप करतात, असं विधान अध्यक्षा किरणमयी नायक यांनी केलं आहे.
येथील पत्रकार परिषदेत किरणमयी नायक म्हणाल्या,जर एखादी विवाहित व्यक्ती एखाद्या मुलीसोबत विवाहबाह्य संबंध ठेवत असेल, तर अशावेळी मुलींनी हे बघायला हवं की ती व्यक्ती त्यांनी जगण्यासाठी मदत करणार आहे की नाही. पण, जेव्हा असे संबंध तुटतात तेव्हा बहुतांश घटनांमध्ये महिला पोलीस ठाण्यात धाव घेतात असे धक्कादायक विधान त्यांनी केले आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, हल्ली १८ व्या वर्षीच लग्न करण्याचं प्रमाण वाढलं आहे. पुढे काही वर्षानंतर जेव्हा मुलं होतात, तेव्हा दाम्पत्याला सोबत राहणं अवघड होत आहे, असं नायक म्हणाल्या. बहुतांश घटना अशा आहेत की लिव्ह इनमध्ये राहून सहमतीने संबंध ठेवल्यानंतरही मुली बलात्काराच्या तक्रारी दाखल करतात. मी महिला/मुलींना आवाहन करते की, त्यांनी आधी नातं समजून घ्यावं. जर तुम्ही अशा प्रकारच्या नातेसंबंधांमध्ये आहात, त्याचा परिणाम वाईटच होईल, असा सल्ला त्यांनी दिला. अर्थात, त्यांचे वक्तव्य आता वादाच्या भोवर्यात सापडल्या आहेत.