जळगाव प्रतिनिधी । सध्याच्या पळवा-पळवीच्या राजकारणावर भाष्य करतांना ना. गिरीश महाजन यांनी सावधान…आता मुलेच नव्हे तर नातवंडेही पळवू असा गर्भित इशारा दिल्यामुळे राजकीय वर्तुळात धमाल उडाली आहे.
जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी राज्य पातळीवर आपल्या कामाची छाप पाडली असून आता ते पक्षाचे संकटमोचक मंत्री म्हणून ख्यात झाले आहे. अगदी कोणत्याही स्थितीत डॅमेज कंट्रोल करण्याची त्यांची स्टाईल अतिशय लोकप्रिय झालेली आहे. या पार्श्वभूमिवर, आज एबीपी माझा या वृत्तवाहिनीवरील तोंडी परीक्षा या कार्यक्रमात गिरीश महाजन यांनी केलेले वक्तव्य चर्चेचा विषय बनले आहे. या कार्यक्रमात त्यांनी अनेक विषयांवर बेधडक मते व्यक्त केली. याप्रसंगी ना. महाजन यांना सध्या सुरू असणार्या पक्षांतराबाबत विचारणा केली असता ते म्हणाले की, सावधान आता मुलेच नव्हे तर नातवंडेही पळवू ! सध्या सुजय विखे यांच्या माध्यमातून मुलांच्या पळवा-पळवीचा मुद्दा चर्चेत असतांना गिरीशभाऊंनी आता नातवंडांपर्यंत चर्चा नेली. विशेष बाब म्हणजे पवारांचे नातू अर्थात पार्थ पवार यांची मावळमधील संभाव्य उमेदवारी चर्चेत असतांना ना. महाजन यांनी केलेले वक्तव्य राजकीय वर्तुळात धमाल उडवणारे ठरले आहे.
ना. गिरीश महाजन यांनी अलीकडेच थेट बारामती नगरपालिका ताब्यात घेण्याचे केलेले वक्तव्यदेखील खूप चर्चेत आले होते. यावरून सुरू असणारे चर्वण समाप्त होत नाही तोच आता त्यांनी थेट शरद पवार यांनाच सूचक इशारा दिल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पहा : ना. गिरीशभाऊ नेमके काय म्हणाले ते !
सावधान… आता मुलंच नाही तर नातवंही पळवू, गिरीश महाजनांचा गर्भित इशारा https://t.co/pInHrzsKFe
— ABP माझा (@abpmajhatv) March 13, 2019