बिनविरोध होणार्‍या ग्रामपंचायतींना ५० लाखांचा निधी ! : आ. मंगेश चव्हाणांची घोषणा

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीच्या निवडणुक प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यातच गावातील वाद टाळता यावे यासाठी आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी बिनविरोध होणार्‍या ग्रामपंचायतींना विकासकामांसाठी ५० लाखांपर्यंत भरघोस निधी देणार असल्याचे जाहीर केले आहे.

चाळीसगाव तालुक्यात येत्या ५ नोव्हेंबर रोजी १२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. दि. २५ ऑक्टोबर रोजी माघारीचा शेवटचा दिवस असून तत्पूर्वी ज्या ग्रामपंचायतींच्या ग्रामस्थांनी एकत्र येत सर्व जागा बिनविरोध कराव्यात आणि ज्या ग्रामपंचायतींच्या सर्व जागा बिनविरोध होतील त्या ५ पर्यंत लोकसंख्या असलेल्या गावाला २५ लाख व ५ हजार लोकसंख्येच्या पुढे असलेल्या गावाला ५० लाख रुपयांचा विकास निधी देण्याचे आमदार चव्हाण यांनी जाहीर केले आहे.

तालुक्याचा विकास करण्यासाठी स्थानिक पातळीवर गावात एकोपा असणे गरजेचे आहे.  ग्रामस्थांनी पक्ष भेद विसरून, गट तट विसरून एकत्र आल्यास गावाचा विकास करण्यास मदत होईल. या हेतूने हि घोषणा करण्यात आली आहे. तत्पूर्वी मागील ४ वर्षात चाळीसगाव मतदारसंघात अनेक ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या होत्या. त्यावेळी देखील आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी बिनविरोध ग्रामपंचायतीना भरघोस विकास निधी दिला होता. एक शब्द पाळणारा व गावागावात विकासासाठी पक्षभेदाच्या पलीकडे जाऊन  काम करणारा आमदार म्हणून मंगेशदादा यांची ओळख असल्यामुळे यावेळेस देखील त्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद मिळणार असल्याचा दावा केला जात आहे.

Protected Content