वाघूर नदीला पूर ; हिवरी-हिवरखेडयाचा संपर्क तुटला (व्हिडिओ)

WhatsApp Image 2019 09 19 at 7.59.44 PM

पहूर, ता. जामनेर , रविंद्र लाठे |  जगप्रसिद्ध अजिंठा लेणींच्या कुशीतुन उगम पावलेल्या वाघूर नदीस डोंगररांगेत झालेल्या दमदार पावसामुळे आज मोठा पूर आला आहे. जामनेर तालुक्यातील हिवरी-हिवरखेडा या गावांचा संपर्क तुटला आहे. भाद्रपद महिन्यांंतही श्रावण महिन्यांसारखी पावसाची रिपरिप सुरू असून शेतीची कामे खोळंबली आहेत.

आज वाघूर नदीला आलेला पूर हा गेल्या काही वर्षांतील सर्वात मोठा पुर असावा. वाघूर नदीच्या पुराने नदी पात्रातील अतिक्रमित केलेल्या काही दुकानांना पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. तर पहूर कसबे येथील शिवमंदिराच्या पायथ्याला पुराचे पाणी लागले. कसबे येथील वाघूर नदीच्या पात्रातील मटण मार्केटलाही पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. यंदा पहूरसह परीसरात गेल्या दहा वर्षांत झाला नाही येवढा पाऊस या वर्षी होत आहे. त्यामुळे संपूर्ण पावसाळ्यात यंदा प्रथमच वाघूर नदी खळाळून ओसंडून वाहत आहे. वाघूर नदी पात्रालगत असलेल्या स्मशानभुमीसही पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे.  सततधार पावसाने परिसरात असलेल्या सर्व नाले, आड ,शेरातील विहिरी, या ओसंडून वाहत आहे. वाघूर नदीचे पात्रालगत असलेल्या एक हात पंप आपोआप ओसंडून वाहत आहे. यंदा तब्बल १० ते १२ वेळेस वाघूर नदीला पुर आला असला तरीही आजचा वाघूर नदिस आलेला पुर खुप मोठा आहे. पुर पाहण्यासाठी वाघूर नदीच्या पुलावर गावकऱ्यांनी पुलाच्या दोन्ही बाजूला गर्दी केली होती. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत होती. वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी पहूर पोलीस व होमगार्ड यांनी परिश्रम घेतले. पुरामुळे हिवरी आणि हिवरखेडा गावांचा संपर्क तुटला होता. येथे पुल बांधण्याची मागणी प्रलंबित असून गावकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे . दरम्यान, नदी पत्रात अतिक्रमण करून बांधण्यात आलेल्या दुकानांंना  पुराचा धोका निर्माण झाला असल्याचे बोलले जात आहे.

Protected Content