जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । “शासन विविध योजना राबविण्यात आपल्या पाठीशी आहे, तसे आपणही स्वच्छतेच्या बाबतीत शासनाच्या पाठीशी उभे राहावे,” असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ‘कंपोस्ट खड्डा भरू, आपलं गाव स्वच्छ ठेवू’ या अभियानाच्या जिल्हास्तरीय शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
शिरसोली प्र. न. येथील मराठी शाळेत आयोजित या कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, प्रकल्प संचालक (पाणी व स्वच्छता) डॉ. सचिन पानझडे, गटविकास अधिकारी सतीश धस, सरपंच हिलाल भील, उपसरपंच द्वारकाबाई बोबडे, माजी सभापती नंदू पाटील, विष्णू भंगाळे, रामकृष्ण काटोले, श्याम कोगटा आदी मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, “घरातील, गावातील आणि शेतातील उकिरडा आपण कंपोस्ट खड्ड्यात पुरल्यास आपल्या शेतासाठी उपयुक्त खत आपल्यालाच उपलब्ध होईल. स्वच्छतेबाबत घेतलेली शपथ केवळ कागदावर न राहता त्याची अंमलबजावणी केल्यास आणि ‘माझं गाव हे माझं अंगण’ समजल्यास स्वच्छतेचे हे कार्य केवळ गावपुरते मर्यादित न राहता ते देशकार्य होईल.”
मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी कंपोस्ट खताचे महत्त्व विशद करताना सांगितले की, या खताच्या माध्यमातून उत्तम मूल्य असलेले खत तयार होऊ शकते. यावेळी नाडेफ खड्डा आणि कचरा विलगीकरण केंद्राचे उद्घाटन आणि लोकार्पण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प संचालक डॉ. सचिन पानझडे यांनी केले, तर सूत्रसंचालन क्षमता बांधणी तज्ञ मनोहर सोनवणे यांनी केले. विस्तार अधिकारी राजेश इंगळे, ग्रामसेवक चिंचोरे, संवाद तज्ञ निलेश रायपूरकर, समाजशास्त्रज्ञ भीमराव सूरदास, समूह समन्वयक शिरीष तायडे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.