धानवड येथे वेगवेगळ्या कारणावरून दोन कुटुंबियांमध्ये हाणामारी

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील धानवड गावात वेगवेगळ्या कारणांवरुन दोन कुटुंबियांमध्ये हाणामारी झाल्याची घटना आज सकाळी घडली. दोन्ही गटात लाठ्या काठ्या, लोखंडी सळई व कुऱ्हाडीने वार करण्यात आले. यात दोन्ही गटांनी दिलेल्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यात भागवत हरी पाटील (वय ७०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा नातु पवन बाळु पाटील याला रवींद्र अहिरे यांच्या दुचाकीचा धक्का लागला. याचा जाब विचारल्याचा राग आल्यामुळे रवींद्र युवराज अहिरे, भुषण अरुण अहिरे, गणेश पंढरीनाथ अहिरे व कैलास युवराज अहिरे यांनी लाठ्या-काठ्या व कुऱ्हाडीने हल्ला चढवला. त्यांनी भागवत पाटील यांच्यासह पवन पाटील, राजश्री पाटील, जयश्री पाटील यांना मारहाण केली. भागवत पाटील यांच्या फिर्यादीवरून रविंद्र अहिरे, भुषण अहिरे, गणेश अहिरे व कैलास अहिरे यांच्याविरोधात एमआयडीसीपोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गफ्फार तडवी करीत आहे.
तर कैलास युवराज अहिरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शेजारी राहणारा पवन पाटील हा अहिरे यांच्या घरातील एकाला फोन करून त्रास देत होता. या संदर्भात अहिरे हे पवनच्या घरी जाऊन त्याला समजाऊन सांगत होते. याचा राग आल्यामुळे पवन पाटील, योगेश समाधान पाटील, समाधान भागवत पाटील, बाळु भागवत पाटील व भागवत हरी पाटील यांनी लाठ्या-काठ्या, सळई व कुऱ्हाडीने हल्ला चढवला. या पाच जणांनी कैलास अहिरे यांच्यासह रवींद्र अहिरे, लताबाई अहिरे, सपना पाटील व गणेश पाटील यांना मारहाण करुन जखमी केले. याप्रकरणी कैलास अहिरे यांच्या फिर्यादीवरून पवन पाटील, योगेश पाटील, समाधान पाटील, बाळू पाटील आणि भागवत पाटील यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सिद्धेश्वर दापकर शांताराम पाटील करीत आहे

Protected Content