यावलमध्ये खरीप हंगाम पूर्व कार्यशाळेत शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल पंचायत समितीच्या सभागृहात महाराष्ट्र शासन कृषी विभागातर्फे खरीप हंगाम २०२५-२६ पूर्व तयारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आवश्यक असलेले आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. तालुका स्तरावरील या एकदिवसीय कार्यशाळेत कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, प्रगतिशील शेतकरी, महिला शेतकरी, शेतकरी गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेंद्रिय शेतीचे पुरस्कर्ते शेतकरी पी. टी. चोपडे होते. तालुका कृषी अधिकारी भरत वारे यांनी कार्यशाळेची प्रस्तावना केली, ज्यात त्यांनी कार्यशाळेचे महत्त्व आणि उद्दिष्ट्ये स्पष्ट केली. शेतकऱ्यांसाठी उपयुक्त विविध विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. न्हावी येथील शेतकरी राहुल चौधरी यांनी ट्रायकोडर्मा आणि जैविक खतांच्या निर्मिती विषयी माहिती दिली, तर कृषी विज्ञान केंद्र, पाल येथील शास्त्रज्ञ डॉ. धीरज नेहेते यांनी माती आणि पाणी परीक्षण कसे करावे याबद्दल मार्गदर्शन केले.

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) अंतर्गत शेती संबंधित व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज आणि अनुदानासंबंधी माहिती विकास कुंभार यांनी दिली. कृषी सहाय्यक कु. समिधा अडकमोल यांनी बियाणे उगवण क्षमता तपासणी आणि कामगंध सापळ्यांचा वापर करण्याचे प्रात्यक्षिक दाखवून खर्चात बचत कशी करावी हे समजावून सांगितले. कृषी पर्यवेक्षक महेश आगिवाल यांनी बीजप्रक्रियेचे महत्त्व आणि ती कशी करावी याबद्दल मार्गदर्शन केले. गणेश बाविस्कर, कृषी सहाय्यक यांनी मातीचा नमुना कसा घ्यावा याची सविस्तर माहिती दिली, तर कृषी पर्यवेक्षक अनंत नारखेडे यांनी शेतकरी उत्पादक कंपनी (FPO) स्थापन करण्याच्या प्रक्रियेविषयी मार्गदर्शन केले.

कार्यशाळेतील प्रमुख मार्गदर्शक स्मार्ट प्रकल्पाचे नोडल अधिकारी विनय बोरसे (धुळे) होते. त्यांनी सेंद्रिय शेती आजच्या काळाची गरज का आहे आणि रासायनिक खतांच्या वापरामुळे मानवी जीवनावर होणारे गंभीर परिणाम यावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या माहितीमुळे शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे महत्त्व आणि त्याचे फायदे समजण्यास मदत झाली.

या महत्त्वपूर्ण कार्यशाळेसाठी सहाय्यक प्रकल्प अधिकारी जी. टी. सोनवणे यांच्यासह कृषी पर्यवेक्षक शिकोकारे, श्रीमती कंकाळ, आगिवाल, पाटील, नारखेडे, जाधव (आत्मा) आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील सर्व कृषी सहायक व इतर कर्मचाऱ्यांनी सक्रिय योगदान दिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी या सर्वांनी अथक परिश्रम घेतले. किनगावचे मंडळ कृषी अधिकारी अजय खैरनार यांनी उपस्थितांचे आभार मानले

Protected Content