Home न्याय-निवाडा जिल्हा परिषद निवडणुकांना मुदतवाढ ; सुप्रीम कोर्टाचा राज्य निवडणूक आयोगाला दिलासा

जिल्हा परिषद निवडणुकांना मुदतवाढ ; सुप्रीम कोर्टाचा राज्य निवडणूक आयोगाला दिलासा

0
149


नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुरू असलेल्या चर्चेला आज महत्त्वाचे वळण मिळाले असून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या वेळापत्रकाबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या विनंतीवरून सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा परिषद निवडणुकांसाठी मुदतवाढ मंजूर केल्याने राजकीय वर्तुळात याबाबत नव्याने हालचाली सुरू झाल्या आहेत.

महापालिका निवडणुकांनंतर राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका घेण्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. याआधी सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारीपर्यंत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश राज्य निवडणूक आयोगाला दिले होते. मात्र, काही तांत्रिक व प्रशासकीय कारणांमुळे निवडणुका वेळेत घेणे कठीण असल्याचे कारण पुढे करत राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

राज्य निवडणूक आयोगाच्या या मागणीवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने जिल्हा परिषद निवडणुकांसाठी १५ दिवसांची मुदतवाढ देण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता आयोगाला निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अधिकचा कालावधी मिळणार असून १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका पूर्ण करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

या निर्णयामुळे राज्यातील राजकीय पक्षांना तयारीसाठी थोडा अधिक वेळ मिळाला असून ग्रामीण भागातील राजकीय समीकरणांवर याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उमेदवार निवड, प्रचार यंत्रणा आणि निवडणूक रणनीती याबाबत आता नव्याने हालचाली वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. तसेच, प्रशासनालाही निवडणूक प्रक्रियेच्या दृष्टीने नियोजन आखण्यासाठी दिलासा मिळाल्याचे बोलले जात आहे.


Protected Content

Play sound