चाळीसगाव प्रतिनिधी । अवघ्या दोन दिवसांवर लोकसभेचा निकाल असतांना आता शहरासह तालुक्यातील पान ठेल्यांवर याबाबतच चर्वण होत असल्याचे दिसून येत आहे.
उन्हाळ्याची तीव्रता आणि दाहकता यात लोकसभा निवडणुकीच्या निकालाने उत्सुकता ताणली गेली आहे. यात निवडणूक संदर्भात एक्झिट पोलच्या अंदाजाने अनेक पक्षांचे धाबे दणाणले आहे. यात शहरासह ग्रामीण भागातील लोकांच्या ठिकठिकाणी कोणाचे सरकार बसणार यावर विचारमंथनातून गप्पा रंगू लागल्या आहेत. यातून पान ठेले देखील सुटले नाहीत असाच काहीसा प्रकार वीर सावरकर चौकातील मुखशुद्धी पान स्टॉलवर दिसून आला. उन्हाळ्यातील लग्न समारंभ आणि त्यात बाहेरील जेवणावळीमुळे परिसरातील हॉटेल्सला गर्दी दिसून येत आहे तर रात्रीच्या जेवणावळीनंतर पानाचा आस्वाद घेण्यासाठी लोकांची पान टपरीवर गर्दी दिसून येत आहे. यात दिवसभरातील घडामोडींवर चर्चा होत असल्याचे दिसून येत आहे. तर लोकसभेत कोण विजयी होणार व कुणाला किती मताधिक्य मिळणार याबाबत उत्सुकता लागल्याचे दिसून येत आहे.