बिग ब्रेकींग : राज्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांना स्थगिती !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांना स्थगिती देण्याची घोषणा केली आहे.

राज्यात एकनाथ शिंदे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आधीच्या सरकारने घेतलेले बहुतांश निर्णय बदलण्यात आले आहेत. यामुळे तरी निवडणुका होतील असे वाटत असतांनाच आज राज्य निवडणूक आयोगाने महत्वाची घोषणा केली आहे.

सध्या २५ जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या २८४ पंचायत समित्यांच्या आरक्षणाची अंतिम अधिसूचना आज अर्थात ५ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येणार होती. त्याचबरोबर १३ जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांची केंद्रनिहाय मतदार यादी ८ ऑगस्ट २०२२ रोजी; तर १२ जिल्हा परिषदा व त्यांच्यातर्गतच्या पंचायत समित्यांची प्रारूप मतदार यादी १० ऑगस्ट २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार होती. आता ही सर्व प्रक्रिया आहे त्या स्तरावर स्थगित करण्यात आली असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे.

या घोषणेमुळे जळगावसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर व गडचिरोलीच्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

Protected Content