मुंबई (वृत्तसंस्था) कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावली असून येत्या गुरुवारी, २२ ऑगस्टला त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. ईव्हीएमला विरोध केल्याच्या रागातून राज यांना ईडीची नोटीस पाठवली आहे. याविरोधात रस्त्यावर उतरणार असून, २२ ऑगस्टलाच ठाण्यात बंद पाळण्यात येईल, असा इशारा मनसेने दिला. एवढेच नव्हे तर, 22 ऑगस्टला गरज असेल तरच घराबाहेर पडा, असा इशाराही मनसे कार्यकर्त्यांनी नागरिकांना दिला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेष जोशी यांना कोहिनूर प्रकरणात ईडीने नोटीस बजावून त्यांना 22 ऑगस्टला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दादरमधील कोहिनूर मिल क्रमांक तीन विकत घेण्यामध्ये राज ठाकरे यांची भूमिका असून यासाठीच ते ईडीच्या रडारवर होते. मात्र या नोटीसनंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राज ठाकरे यांना 22 तारखेला चौकशीसाठी बोलावले तर ठाणे बंद करु, असे मनसेचे ठाणे, पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितले. तसेच प्रेमाने बंद केले तर स्वागत नाहीतर कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला. राज्यात त्यादिवशी जे घडेल, त्याला सरकार आणि जबाबदार असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली. राज ठाकरे कुणालाही भीक घालत नाहीत, ते ईडीच्या नोटिशीलाही भीक घालणार नाहीत. ईव्हीएमविरोधात राज हे सर्वपक्षीयांना एकत्र आणून मोर्चा काढणार आहेत. हा मोर्चा काढू द्यायचा नसून, सरकारने दडपशाहीचे धोरण अवलंबले आहे, असेही चव्हाण म्हणाल्या.