नवी दिल्ली (वृत्तसंस्था) चीनी सैन्य भारतीय हद्दीत घुसलेच नव्हते, तर मारहाण होऊन जवान शहीद झालेच कसे ? असा प्रश्न उपस्थित करून वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदी देशवासीयांची फसवणूक करत खोटे बोलत असल्याचा आरोप केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत चीनने भारतीय हद्दीत घुसखोरी किंवा भारताची कोणतीही चौकी त्यांच्या ताब्यात गेलेली नाही, असे सांगत उपस्थितांना आश्वस्त केले होते. तसेच भारताची एक इंच जमीनही कोणीही बळकावू शकणार नाही. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कर समर्थ असल्याचे मोदींनी सांगितले होते. मोदींच्या या वक्तव्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मोदींना काही प्रश्न विचारले आहेत. लडाख सीमारेषेवरील घुसखोरीसंदर्भात मोदींनी जनतेशी फसवणूक करत खोटे बोलल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला आहे.