मुख्यमंत्री संवेदनशील परिस्थितीत थिल्लरपणा करत आहेत’

 

पंढरपूर : वृत्तसंस्था । ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संवेदनशील परिस्थितीत थिल्लरपणा करत आहेत’, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिले. ‘इतक्या दिवसांतून आज तीन तासांसाठी बाहेर आला आहात तर लगेचच स्वतःची तुलना मोदी साहेबांशी करू नका’, असा टोलाही लगावला.

सरकार चालवायला दम लागतो, केंद्राने कोणतेही पैसे थकवले नसून राज्याचा जीएसटी कमी जमा झाल्याने त्याची भरपाई केंद्र सरकार करून देत आहे, असेही फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एकाच दिवशी पूरग्रस्त भागांच्या दौऱ्यावर निघाले असताना थेट बांधावरूनच या दोघांत वाकयुद्ध रंगलं आहे. मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांच्या टीकेला उत्तर दिल्यानंतर फडणवीसांनी पलटवार केला

अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी फडणवीस आज माढा आणि करमाळा दौऱ्यावर आले होते. तिथे नुकसानीची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानांकडे फडणवीसांचे लक्ष वेधले असता फडणवीस यांनी त्याला उत्तर दिले. केंद्र सरकारने नेहमीच महाराष्ट्राला मदत केली आहे. आता लोकांना तातडीने मदतीची गरज आहे अशावेळी केंद्राकडे मदतीसाठी बोट दाखवण्याऐवजी हिम्मत असेल तर राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी, असे आव्हान फडणवीस यांनी दिले.

केंद्र सरकारने कर्ज काढून राज्याच्या जीएसटीचे पैसे दिले आहेत असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे जनतेची दिशाभूल करीत आहेत, असा आरोप फडणवीस यांनी केला. मला अर्थशास्त्र चांगले कळते असे सांगताना राज्याने ५० हजार कोटी कर्ज घेतले आहे. आणखी ७० हजार कोटी रुपये कर्ज काढण्याची राज्याकडे क्षमता आहे, असे फडणवीस म्हणाले. कर्ज काढा पण शेतकऱ्यांना मदत करा. आम्ही शेतकऱ्यांना केंद्राच्या मदतीची वाट न बघता १० हजार कोटी रुपये मदत केली होती, अशी आठवणही फडणवीस यांनी अजित पवार यांना करून दिली.

पूर परिस्थितीमध्ये राजकारण न करता सर्वांनी एकत्र येत केंद्राकडे मदत मागितली पाहिजे. उगाच राजकारणाचा चिखल उडवू नये, केंद्राकडे मदत मागण्यात गैर काय? केंद्रातील सरकार हे देशाचे सरकार आहे, परदेशातील नाही, बिहारमध्ये प्रचार करण्यापेक्षा आपल्या राज्यात लक्ष घाला. तुम्ही राज्याचे विरोधी पक्षनेते आणि एक जबाबदार नेते आहात. तेव्हा केंद्र सरकार आणि राज्य सरकार पूरग्रस्त जनतेसाठी काय करेल याचा विचार करण्यापेक्षा तुम्ही ज्या राज्याचे आहात त्यासाठी आधी काम करा. तुम्ही सध्या नियमितपणे बिहारला जात आहात. तसं थोडं दिल्लीतही जा. तुम्ही दिल्लीत गेलात तर पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील घराबाहेर पडतील, असे मुख्यमंत्री म्हणाले होते.

Protected Content