जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या यामुळे खोटेनगर ते माऊली नगर (खेडी) मार्गावरील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस गंभीर होत आहे. गर्दीच्या वेळेत या मार्गावर वाहनांच्या रांगा लागत असल्याने नागरिकांचा वेळ आणि इंधन वाया जात असून, या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून उड्डाणपूल उभारण्याची मागणी जोर धरत आहे.
परिसरातील नागरिकांनी याबाबत आमदार राजूमामा भोळे आणि खासदार स्मिता वाघ यांना निवेदन देत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली. शहराचा विस्तार वेगाने होत असल्याने भविष्यात या मार्गावरील वाहतुकीचा ताण आणखी वाढण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. सकाळच्या कार्यालयीन वेळेत तसेच सायंकाळच्या गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी आणि रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. रुग्णवाहिका, अग्निशमन दल तसेच इतर अत्यावश्यक सेवांच्या वाहनांनाही कोंडीचा फटका बसण्याची शक्यता असल्याने प्रश्न गांभीर्याने घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनावेळी मिलिंद चौधरी, अमेय राणे, गौरव येवले, जयेश पाटील, दर्शन काळे, सागर बोरोले, योगेश काळे, दीपक काळे, कुणाल भोळे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.



