दुर्देवी; एकाच दिवशी दोन हरीणांचे आढळले मृतदेह

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । काल एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन हरीणांचे मृतदेह आढळून आले. तसेच दुसऱ्या एका घटनेत विहीरीत पडलेल्या हरीणाला वाचविण्यात वनविभागाच्या प्रयत्नांना यश आले आहे.

नुकतेच घोषित झालेल्या मुक्ताई – भवानी अभारण्यात काल दि १ जुलै रोजी या घटना घडल्या असून प्राणीप्रेमीमध्ये नाराजी व्यक्त होत वन्यप्राणी सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, “मुक्ताईनगर तालुक्यातील व्याघ्र अधिवासक्षेत्र ‘मुक्ताई-भवानी’ अभयारण्यातर्गत ‘डोलारखेडा’ वनपरीमंडळातील  वनसीमालगत पूर्णा नदीपात्रात मलकापुर – बऱ्हाणपुर रस्त्याच्या बाजूला कुंड पुलानजिक एका नर जातीच्या हरीणाचा मृतदेह सकाळी ११ वाजता आढळून आला. याच परिमंडळातील पिंप्रीपंचम नियतक्षेत्रात असलेल्या नाल्यात एका नर जातीच्या हरीणाचा मृतदेह आढळून आला.

तत्पूर्वी नायगांव फाट्यानजिक असलेल्या शेती शिवारातील विहिरीत हरीण पडले असून ते अद्याप जिवंत असल्याची माहीती वनविभागाला मिळताच वनपरीक्षेत्र अधिकारी सचिन ठाकरे यांनी तात्काळ वनविभागाचा फौजफाटा घटनास्थळी रवाना केला. मोठ्या शिताफीने प्रयत्नाअंती विहीरीत पडलेल्या हरणाला सुखरुप बाहेर काढण्यात यश आले. वनविभागाने वेळीच दाखविलेल्या सतर्कतेबाबत वन्यप्रेमीं तसेच स्थानिकांकडून वनविभागाचे कौतुक होत आहे.

सकाळपासूनच लागोपाठ या घटना उघडकिस आल्या. सकाळी अकराच्या सुमारास हरणाचा मृतदेह आढळला नेमकं त्याचवेळी कुऱ्हा-काकोडा येथून मुक्ताईनगरकडे  निघालेले वनपरीक्षेत्र अधिकारी सचिन ठाकरे यांना हि बाब समजताच त्यांनी लागलीच वाहन थांबवून घटनास्थळी स्वत: पाहणी करुन मोबाईलद्वारे कर्मचाऱ्यांना सूचना केल्या; तसेच तालुका पशुधनविकास अधिकारी तथा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ डुघ्रेकर यांना मृत हरीणाचे शवविच्छेदन करुन माहिती मिळणेसंदर्भात कळविले. घटनास्थळी पोहचलेल्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना करुन ते मुक्ताईनगर येथे रवाना झाले.

दरम्यान दोन्ही ठिकाणी घडलेल्या या घटना भटक्या कुत्र्यांच्या टोळीने हरीणांच्या कळपाचा पाठलाग करुन हल्ला केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज समोर येत असुन रस्त्याने ये-जा करणाऱ्या काही स्थानिकांच्या निर्दशनास नदीवर पाणी पिण्यासाठी आलेल्या हरीणांच्या कळपाचा पाठलाग काही कुत्रे करत असल्याचे कळते. पिंप्रीपंचम नियतक्षेत्रातील नाल्यावर तसेच दक्षिण डोलारखेडा नियतक्षेत्रातील पूर्णा नदी पुलाजवळ भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला असुन वन्यजीवांवर हल्ला चढवून ठार केले जात आहे. अशीच घटना महीनाभरापूर्वी कोथळी येथील मुक्ताई मंदीर परीसरात घडली होती.

या दुर्देवी घटनांमुळे वन्यप्राण्यांचा अधिवास धोक्यात आला असून त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संवेदनशील विषयाबाबत भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त अथवा त्यांच्यापासून वन्यप्राण्यांचे रक्षण कशा पद्धतीने करता येईल? याबाबत प्रयत्न झाले पाहीजेत. अशी अपेक्षा स्थानिकांसह वन्यप्रेमींकडून होत आहे.

दरम्यान दोघंही हरिणांचे मृतदेह पंचनामा करुन डोलारखेडा येथील वनकर्मचारी निवास्थानी आवारात आणण्यात आले.पशुवैद्यकिय अधिकारी डॉ डुघ्रेकर,सहकारी डॉ.चव्हाण, परीचालक सुरवाडे यांनी मृत हरीणांचे शवविच्छेदन केले. वनपरीक्षेत्र अधिकारी यांच्या उपस्थितीत संद्याकाळी विधीवत मृत हरीणांचा अंत्यवीधी करण्यात आला.”

याप्रस़गी वनपरीक्षेत्र अधिकारी सचिन ठाकरे,वनपाल डि जी पाचपांडे, वनरक्षक दिपाली बेलदार, वनरक्षक विकास पाटील, थोरात, वनमजुर तुकाराम गवळी, अशोक पाटील, योगेश कोळी, सिद्धार्थ थाटे, संजय सांगळकर, वाहन चालक सुरेश महाले, सटीक पिंजारी, महेंद्र पुरकर यांच्यासह डोलारखेडा ग्रामस्थांची उपस्थिती होती.

मृत हरीणांच्या मृत्यूच्या शवविच्छेदन अहवालानुसार हिस्र प्राण्यांच्या अथवा कुत्र्यांचा हल्ल्यात अॅटक येऊन मृत्यु झाला असल्याचे कळते. वाघ अथवा बिबट्याने हा हल्ला केलेला नाही. असे घटस्थळी प्रत्यक्ष केलेल्या पाहणीत समोर येते. तसेच नायगांव शिवारात विहीरीत पडलेल्या हरीणाला सुखरुपपणे बाहेर काढून जंगलात सोडण्यात आले. आल्याचे मुक्ताई-भवानी अभयारण्याचे वनपरीक्षेत्र अधिकारी यांनी सांगितले.

Protected Content