पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नार पार प्रकल्पाचे पाणी गिरणा धरणात आणण्यात यावे जेणेकरून जळगांव जिल्ह्यातील अनेक तालूके हे सुजलाम सुफलाम होतील. यासोबतच अडीच लाख हेक्टर सिंचन क्षेत्र वाढणार असल्याने नार पार प्रकल्पाचे पाणी गिरणा धरणात आणावे अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे युवा तालुका प्रमुख शशि पाटील यांनी पत्रकार परिषदेद्वारे केली आहे. याप्रसंगी युवा सेना उपजिल्हाप्रमुख संदिप जैन, हरिभाऊ पाटील, प्रेमचंद पाटील, अरुण पाटील, बंडु सोनवणे उपस्थित होते.
नार पार प्रकल्पाचे पेट सुरगाणा या तालुक्यातील वाया जाणारे नार – पार टेकडी पर्यंत चे अंतर ६ कि. मी. असुन या ६ कि. मी. मार्गावर टुनेल करुन त्याद्वारे गिरणा धरणात आणल्यास गिरणा धरणाचा १० टक्के साठा कायमस्वरूपी वाढणार आहे. याचा थेट फायदा जळगांव जिल्ह्यातील अमळनेर, चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल, धरणगाव या तालुक्यांना होऊन हे तालुके सुजलाम सुफलाम होतील. यासोबतच अडीच लाख हेक्टर सिंचन क्षेत्र वाढणार आहे. या योजनेत सुमारे साडेसात हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. लवकरात लवकर हा प्रकल्प पूर्णत्वास न्यावा. अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. माजी खासदार उन्मेष पाटील हे याच मागणीसाठी चाळीसगाव येथे दोन दिवसांपासून पाण्यात अर्धनग्न आंदोलन करीत आहे. त्यांना आमचा पाठिंबाच आहे. त्यांचे आंदोलन यशस्वी करण्यासाठी आम्ही देखील ओझर येथे गिरणा नदीत सोमवारी २६ रोजी अर्धनग्न आंदोलन करणार आहे,असे ही त्यांनी यावेळी जाहिर केले आहे.


