धरणगावातील संचारबंदी एक दिवसासाठी वाढविली !

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गायरान अतिक्रमण हटविल्यानंतर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लावण्यात आलेल्या संचारबंदीत प्रशासनाने वाढ केली आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, धरणगाव शहरातील अमळनेर रोडवर असणार्‍या गायरानासाठी राखीव असलेल्या जमीनीवरील वादग्रस्त अतिक्रमण कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये काढण्यात आले. या प्रक्रियेमुळे शहरात कोणताही अनुचीत प्रकार होऊ नये म्हणून दिनांक २ नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजेपासून ते दिनांक ४ नोव्हेंबर सकाळी आठ वाजेपर्यंत अर्थात ३६ तासांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली होती. अर्थात, आज सकाळी आठ वाजता ही संचारबंदी उठणार होती.

दरम्यान, शहरातील सध्याचे वातावरण पाहता प्रशासनाने ही संचारबंदी एक दिवसासाठी म्हणजेच उद्या दिनांक ५ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत वाढविली आहे. या संदर्भातील आदेश प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी जारी केले आहेत. या आदेशातून रूग्णसेवा, पाणी पुरवठा, शहरातून जाणारी वाहतूक, शासकीय कर्मचारी, सार्वजनीक वितरण व्यवस्था आदींना वगळण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Protected Content