मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा | ‘आमदार पळून गेले म्हणजे पक्ष संपत नसतो’, असे नमूद करत धनुष्यबाण हे चिन्ह आमच्यापासून कोणीही राहून घेऊ शकत नाही असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.
उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की आपल्या पक्षात पडलेली उभी फूट ही आज सुद्धा अनाकलनीय वाटते. आज फुटीर आमदार म्हणतात की भाजपशी बोलणी करा पण हे आता होणार नाही. आम्ही भाजपशी बोलणी करणार नाही. जे आत्मसन्मानाने होऊ शकले असते ते अपघाताने कधीही होणार नाही. खरंतर गेल्या अडीच वर्षात या सर्वांच्या मनात जर काही असेल तर ते त्यांनी बोलून दाखवायला पाहिजे होते. पण तसे झाले नाही गेल्या अडीच वर्षात ही सर्व मंडळी मूग गिळून का बसली होती ? असा सवाल देखील त्यांनी केला.
उद्धव ठाकरे म्हणाले की एखाद्या पक्षातून आमदार पडून गेले याचा अर्थ तो पक्ष नष्ट झाला असे होत नाही. पक्ष आहे तिथेच असतो. आज ही मंडळी निघून गेली असली तरी पुढील निवडणुकीत त्यांना लोकांना तोंड दाखवायचे आहे हे लक्षात ठेवावे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महाराष्ट्रातून आम्हाला लोक येऊन भेटत आहेत.यातील बहुतांश लोक हे सर्वसामान्य आहेत. त्यांना हे जे काही घडले त्याबद्दल खूप वाईट वाटत आहे. सर्वसामान्यांचे हे प्रेम ही शिवसेनेची ऊर्जा असून यात आम्ही भरारी घेणार असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की अनेक ठिकाणचे नगरसेवक हे फुटीरांना जाऊन मिळत असल्याच्या बातम्या येत आहेत. खरंतर याप्रसंगी महापालिका बरखास्त झालेल्या असल्यामुळे हे सर्वजण माजी नगरसेवक आहेत. ते त्यांचे समर्थक असल्यामुळे त्यांच्यासोबत गेले असे फार तर म्हणता येईल. पण याचा अर्थ सगळेच लोक त्यांच्यासोबत गेले असा होत नसल्याचेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.