नवरात्रोत्सवाचे स्वरूप सांगा

 

 

मुंबई, वृत्तसंस्था । भाजपचे आमदार अॅड. आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून महत्त्वाची मागणी केली आहे. नवरात्रोत्सवात मूर्तीकारांना दिलासा देण्याची मागणी सरकारकडं केली आहे. ‘ मूर्तीकार देवीची मूर्ती घडविण्यास सुरुवात करत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देवीच्या मूर्तीची उंची किती असणार? नवरात्र उत्सवाचे स्वरूप कसे असणार? गणेशोत्सवाचे नियम या उत्सवालाही लागू असतील की त्यात बदल होणार? याबाबत मूर्तीकारांना वेळीच माहिती मिळण्याची आवश्यकता आहे,’ असं शेलार यांनी म्हटलं आहे.

आधीच मूर्तीकारांना मोठा फटका बसला आहे. मूर्तींच्या उंचीबाबत स्पष्टता होण्यास उशीर झाल्यानं चार फूटांपेक्षा उंच असलेल्या अनेक मूर्ती कारखान्यात शिल्लक आहेत. मोठ्या संख्येने मूर्तीकार व कारखाने असलेल्या पेणमधील दोहे, हरामपूर, केळवे या गावांचे आर्थिक नुकसान २० ते २५ कोटींचे आहे. तेच मूर्तीकार आता देवीच्या मूर्ती घडविणार असल्यानं वेळीच सरकारनं स्पष्टता आणणं गरजेचं आहे.

मुंबई शहरात देवीच्या मूर्ती घडवणारे ५ हजार मूर्तीकार व कारखाने आहेत. मूर्तीच्या उंचीच्या बाबतीत त्यांच्या मनात संभ्रम आहे. मूर्तीकार ही एक छोटी इंडस्ट्री असून हजारो कामगार, कारागिरांचा उदरनिर्वाह त्या उद्योगावर अवलंबून आहे. इतर उद्योगांप्रमाणे या उद्योगालाही करोनाची झळ बसली आहे. त्यांचे अधिक नुकसान होऊ नये म्हणून उत्सवाच्या नियमावली सरकारनं वेळीच जाहीर करावी. अशी मागणी शेलार यांनी पत्रातून केली आहे.

Protected Content