ओला दुष्काळ जाहिर करा ; अन्यथा रस्त्यावर उतरु – अमोल शिंदे

पाचोरा प्रतिनिधी । संपूर्ण जिल्ह्यासह पाचोरा व भडगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी पूर्णपणे आर्थिक दृष्ट्या संकटात सापडला असून तालुक्यात ओला दुष्काळ जाहिर करुन शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी भाजपचे अमोल शिंदे यांच्यातर्फे प्रशासनाला निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. दरम्यान, वेळप्रसंगी गरज पडल्यास रस्त्यावर देखील उतरु, असा इशारा शिंदे यांनी बोलताना दिला.

संपूर्ण जिल्ह्यासह पाचोरा व भडगाव तालुक्यात गुलाब चक्रीवादळामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे व मागील काही दिवसांपासून सतत पडत असलेल्या पावसाने उद्भवलेल्या पूर सदृष्य परिस्थितीने दोन्ही तालुक्यात कापूस, मका, ज्वारी, बाजरी, तूर इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी पूर्णपणे आर्थिक दृष्ट्या संकटात सापडला आहे. तसेच पाचोरा  व भडगाव तालुक्यात खरीप हंगामातील प्रमुख पीक असलेल्या उडीद मूग सोयाबीन इत्यादी पिकांची मागील काळात पावसात मोठा खंड पडल्याने पिकाच्या दाणे भरण्याच्या अवस्थेत पूर्णपणे नुकसान झाले होते. त्यावेळी देखील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता.

यावर्षी जळगाव जिल्ह्यात पर्जन्यमानाची परिस्थिती पाहता खरीप हंगामाच्या सुरुवातीला कमी पाऊस झाल्याने पिकांची वाढ खुंटली होती.परंतु शेतकरी बांधवांनी उपलब्ध सिंचन सुविधेद्वारे पिके जतन करून जगवली होती. परंतु ऐन उत्पन्न येण्याच्या वेळी (म्हणजे कापूस पीकांत बोंड परिपक्व होत असताना व ज्वारी, बाजरी, मका पिकाचे कणीस भरत असतांना) झालेल्या मुसळधार पावसामुळे पीके पडली असून त्यांना कोम फुटलेले आहेत. तसेच पूर परिस्थितीमुळे पूर्ण पीके आडवी झालेली आहेत.

तरी अशा भयावह परिस्थितीत कोरडवाहू जमीन धारक शेतकऱ्यांना २५ हजार रुपये प्रति एकरी मदत मिळावी. तसेच बागायती शेतीसाठी ४० हजार रुपये प्रति एकरी मदत निसर्गिक नियमांतर्गत करण्यात यावी व शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे तात्काळ जमा करण्यात यावेत. अशा मागणीचे निवेदन आज दि. ३० रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने तालुका अध्यक्ष अमोल शिंदे व जिल्हा सरचिटणीस तथा जि. प. सदस्य मधुकर काटे यांच्या नेतृत्वात प्रशासनाला देण्यात आले. यावेळी अमोल शिंदे यांनी बोलतांना सांगितले की, पाचोरा – भडगाव तालुक्यात दि. २८ सप्टेंबर २०२१ रोजी अतिवृष्टी व ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने तसेच मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसाने पूर परिस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे पाचोरा – भडगाव तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव हवालदिल झाले असून शासनाने कुठलेही निकष न लावता सरसकट पंचनामे करून कोरडवाहू जमीन धारक शेतकऱ्यांना २५ हजार रुपये प्रति एकरी व बागायती क्षेत्रास ४० हजार रुपये प्रति एकरी मदत नैसर्गिक नियमांतर्गत करण्यात यावी व तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात यावे.

तसेच प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम – २०२१ मधील शासन निर्णयात अनुक्रमांक १०.२ मध्ये नमूद केल्यानुसार हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत (मिड   सिझन अॅडव्हरसिटी) अन्वये पूर परिस्थिती उद्भवल्यास शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पन्नामध्ये सरासरी उत्पन्नाच्या ५० टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर नुकसान भरपाई च्या प्रमाणात विमाधारक शेतकऱ्यांना २५ टक्के मर्यादेपर्यंत आगाऊ रक्कम देण्याचे नमूद केलेले आहे. तरी या संदर्भात पाचोरा व भडगाव तालुक्यातील पिक विमा धारक शेतकऱ्यांकरिता अधिसूचना जाहीर करून संबंधित विमा कंपनी विमा धारक शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित रक्कम वर्ग होणे करिता आदेश करण्यात यावे. अशा आग्रही मागणीचे निवेदन आम्ही दिले असून शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळवून देण्याकरिता भारतीय जनता पार्टी त्यांच्या सोबत खंबीरपणे उभी आहे. वेळप्रसंगी गरज पडल्यास रस्त्यावर देखील उतरु असा इशारा भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी बोलताना दिला.

याप्रसंगी जि. प. सदस्य तथा जिल्हा सरचिटणीस मधुकर काटे, पंचायत समिती सभापती वसंत गायकवाड, पंचायत समिती सदस्य सुभाष पाटील, बन्सीलाल पाटील, सरचिटणीस गोविंद शेलार, संजय पाटील, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष कांतीलाल जैन, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रेखा पाटील, सुनील पाटील, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष मुकेश पाटील, शहराध्यक्ष समाधान मुळे, भैया ठाकूर, विरेंद्र चौधरी, भैय्या चौधरी, आशिष जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content