नवी दिल्ली वृत्तसंस्था । हैदराबादमधील एन्काऊंटरमुळे देशात समाधान व्यक्त होत असतांना उन्नाव येथील पीडित तरूणीने रात्री शेवटचा श्वास घेतल्याने खळबळ उडाली आहे.
उत्तरप्रदेशातील उन्नाव येथील एका तरूणीला नराधमाने विवाहाचे आश्वासन देऊन भुलविले. यानंतर त्याने आपल्या साथीदारासह डिसेंबर २०१८ मध्ये संबंधीत तरूणीवर सामूहिक अत्याचार केले. तिने याबाबत पोलीस स्थानकात तक्रार देण्याचा प्रयत्न केला तरी पोलिसांनी तिची दाद घेतली नाही. चार महिन्यानंतर याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर ती गुरूवारी न्यायालयात सुनावणीसाठी जात असतांना आरोपींनी इतरांच्या सोबतीने पिडीतेवर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. यात जवळपास ९० टक्के जळालेल्या अवस्थेत असणार्या या पिडीतेला नवी दिल्लीच्या एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिने शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास शेवटचा श्वास घेतला. कालच हैदराबाद येथील एन्काऊंटरमुळे देशात समाधान व्यक्त होत आहे. यामुळे आता उन्नावच्या आरोपींनाही तातडीने शिक्षा मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.