जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यात आज दुपारनंतर झालेल्या अवकाळी पावसामुळे तसेच गारा पडल्याने काही तालुक्यांमध्ये शेती पिकांचे, घरांचे व जनावरांचे नुकसान झाल्याच्या प्राथमिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कोणतीही विलंब न करता नुकसानग्रस्त भागांतील पंचनामे तातडीने पूर्ण करावेत, असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
काही भागांमध्ये रस्त्यांवर झाडे व वीज तारा पडल्याच्या तक्रारी असून, अशा ठिकाणी तातडीने झाडे हटवून रस्ते मोकळे करावेत तसेच वीज तारा दुरुस्त करून खंडित वीजपुरवठा सुरळीत करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
सध्या पालकमंत्री पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चौंडी (जि. अहिल्यानगर) येथे त्यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित राज्य मंत्रीमंडळ बैठकीस उपस्थित आहेत. त्यांनी दूरध्वनीद्वारे जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला.
वादळी पावसामुळे पिकांचे, घरांचे तसेच जनावरे दगावली असल्यास अशा सर्व प्रकारच्या नुकसानीचा समावेश करून योग्य पद्धतीने पंचनामे करावेत. असेही त्यांनी स्पष्ट केले.
महसूल, कृषी आणि पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ कार्यवाही सुरू करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. दरम्यान, प्रशासनाकडून मदत प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, नागरिकांनी अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.