प्रशासनासोबत सामाजिक बांधिलकी जपा !, जि.प. सीईओ मीनल करनवाल यांचे आवाहन

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । प्रशासकीय काम हे आपल्या नोकरीचा भाग असले तरी, ते कर्तव्य भावनेतून करावे लागते. मात्र, यासोबतच ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ आणि गावातील स्वच्छतेसारखे उपक्रम राबवून आपण सर्वांनी सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे, असे महत्त्वपूर्ण आवाहन जिल्हा परिषदेच्या सीईओ मीनल करनवाल यांनी केले. त्या आज अमळनेर दौऱ्यावर होत्या आणि येथील गंगाराम सखाराम हायस्कूलमध्ये आयोजित सरपंच व ग्रामसेवकांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. या वेळी अमळनेरचे गटविकास अधिकारी एन. आर. पाटील हे देखील उपस्थित होते.

जिल्हा परिषदेच्या सीईओ श्रीमती मीनल करनवाल यांनी आज अमळनेर तालुक्याचा दौरा केला. दौऱ्याच्या सुरुवातीला त्यांनी म्हसले गावाला भेट देऊन तेथील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या घरकुल बांधकामाच्या कामांची पाहणी केली. विशेष म्हणजे, करनवाल यांनी स्वतः ‘आवास ॲप’च्या माध्यमातून घरकुलांबाबतचे सर्वेक्षण केले आणि कामाच्या प्रगतीची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी टाकरखेडे गावाला भेट देऊन तेथे सुरू असलेल्या घरकुल कामांचा आढावा घेतला. गावामध्ये शासनाच्या विविध योजना कशा प्रकारे राबविल्या जात आहेत, याची माहिती त्यांनी जाणून घेतली आणि सुरू असलेली घरकुलांची बांधकामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

श्रीमती करनवाल यांनी अमळनेर तालुक्यातील आयएसओ नामांकन प्राप्त ग्रामपंचायतीला भेट देऊन पाहणी केली. या वेळी त्यांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले. त्यानंतर अमळनेर येथील गंगाराम सखाराम हायस्कूलमध्ये आयोजित ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीला त्यांनी संबोधित केले. या बैठकीत त्यांनी ‘जलतारा’ आणि ‘मिशन संजीवनी’ यांसारख्या महत्त्वाच्या योजनांविषयी उपस्थित ग्रामसेवक आणि सरपंच यांना सविस्तर मार्गदर्शन केले. गावागावांमध्ये जाणवणारी पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेता, ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ सारखे जलसंधारणाचे उपक्रम स्वयंस्फूर्तीने हाती घेण्याचे आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून काम करण्याचे आवाहन श्रीमती करनवाल यांनी या वेळी केले. त्यांच्या या आवाहनाला सरपंच आणि ग्रामसेवकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

Protected Content