पंचनामे न करता नुकसान भरपाई तातडीने जाहिर करण्याची आ. पाटलांची मागणी

पारोळा प्रतिनिधी । तालुक्यांमध्ये अतिवृष्टी व गुलाब चक्रीवादळामुळे ओला दुष्काळ जाहिर करुन नुकसानीचे पंचनामे न करता पिक पेरा निहाय नुकसान भरपाई तातडीने देण्यात यावी, अशी मागणी आमदार चिमणराव पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आदी अधिकाऱ्यांनी केली आहे.

पारोळा, एरंडोल व भडगाव जि. जळगाव तालुक्यात ऑगष्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संपूर्ण भागातील शेतांमध्ये पाणी साचून पिकांचे मोठे नुकसान नव्हे तर पूर्णतः पिके नष्ट झाली आहेत. तसेच बोंडअळीचा प्रादुर्भावामुळे कापूस, मका यांसह अन्य पिके देखील बाधित झाले आहेत. या अस्मानी संकटामुळे शेतकरी पूर्णतः उध्वस्थ झाला आहे. अगोदरच उशिराने पडलेला पाऊस तसेच पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे व त्यानंतर संततधार अतिवृष्टीमुळे १००% पिके नष्ट झाली आहेत. सर्वत्र अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अश्या परिस्थितीत शेतकऱ्यांना धीर देणे अत्यंत आवश्यक असल्याने पंचनामे न करता सरसकट पीकपेरा निहाय आर्थिक मदत जाहीर करणे गरजेचे असून शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळणेसाठी आपल्या स्तरावरून संबंधितांना योग्य ते आदेश निर्गमित करून आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्यात यावी अशी मागणी आमदार चिमणराव पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दादा भुसे, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जळगांव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचेकडे केली आहे.

 

Protected Content