कोरोनातून बरे झालेल्यांनी केव्हा घ्यावी लस ? : जाणून घ्या नवीन मार्गदर्शक तत्वे !

नवी दिल्ली वृत्तसंस्था | केंद्र सरकारने आज लसीकरणासाठीची नवीन मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली असून यात कोरोनातून बरे झालेल्यांनी नेमकी केव्हा लस घ्यावी याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत.

आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव विकास शील यांनी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. यात कोरोनातून बरे झाल्यानंतर नागरिकांनी तीन महिन्यांनंतर कोरोनाची लस घ्यायची आहे, अशी माहिती संक्रमित आढळलेल्यांच्या लसीकरणात तीन महिन्यांचा विलंब होईल. त्यात ’बूस्टर’ डोसचा देखील समावेश आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठवलेल्या पत्रात, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव विकास शील यांनी म्हटले आहे की, कोविड -१९ संसर्गाची चाचणी पॉझिटिव्ह आढळलेल्या नागरिकांना आता तीन महिन्यांनी बरे झाल्यानंतर डोस देण्यात येईल. यामध्ये बूस्टर डोसचा देखील समावेश आहे. शील यांनी संबंधित अधिकार्‍यांना याची दखल घेण्याचे आवाहन केले आहे.

यासोबत लस मिळाल्यानंतर किंवा कोरोना विषाणूपासून बरे झाल्यानंतर शरीरात किती महिने प्रतिकारशक्ती म्हणजेच अँटीबॉडी अबाधित राहते, याबाबत लोकांचे अनेक प्रश्न आहेत. आयसीएमआरचे डीजी बलराम भार्गव यांनी लोकांच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नाबाबत माहिती दिली आहे.

बलराम भार्गव यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाबाधित रुग्ण बरा झाल्यानंतर किंवा लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर सुमारे नऊ महिने अँटीबॉडी असते. आयसीएमआरच्या डीजी बलराम भार्गव यांच्या म्हणण्यानुसार, लसीपासून मिळालेल्या प्रतिकारशक्तीवर भारतात एक अभ्यास झाला आणि जागतिक स्तरावरही संशोधन झाले. या अभ्यासातून हे स्पष्ट झाले आहे की अँटीबॉडी शरीरात सुमारे नऊ महिने टिकते.

Protected Content