जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जनता एक्सप्रेसमध्ये गार्ड आणि सुरक्षा रक्षकांमध्ये तुफान हाणामारी झाल्याने खळबळ उडाली असून यामुळे संतप्त झालेल्या गार्ड कर्मचार्यांनी ठिय्या आंदोलन करत निषेध व्यक्त केला.
बिहार कडून येणारी पटना एक्सप्रेस रात्री बारा वाजता खंडा स्टेशन वर आल्यानंतर या गाडीला खंडव्याहून भुसावळ पर्यंत एस्कॉर्ट सुरक्षा देण्याची जबाबदारी रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी संजीव कुमार, जितेंद्र सोलंकी व संदीप कुमार यांच्यावर देण्यात आली होती.
खंडव्याला ही गाडी पाऊण तास उशिरा आल्याने त्याची चौकशी करण्यासाठी हे सुरक्षारक्षक पोलीस गार्डच्या डब्यात गेले. तेथे रजनीकांत व त्यांच्यासोबत असलेले राजेश मिना या यांनी रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचार्यांसोबत मोठमोठ्याने आवाज करून वाद घातला. यावेळी सुरक्षा रक्षक संदीप कुमार व एका गार्ड मध्ये जोरदार हाणामारीही झाली. खंडवा येथून बर्हाणपूर स्टेशनवर गाडी आल्यानंतरही या कर्मचार्यांमध्ये वाद होऊन अर्धा तास गाडीचा खोळंबा झाला.
दरम्यान, या हाणामारीची माहिती भुसावळ रेल्वे पोलीस व जीआरपी पोलीस यांना समजल्यानंतर दोन्ही विभागाच्या पोलिसांचा ताफा भुसावळ स्टेशनवर तैनात करण्यात आला होता, तसेच यावेळी स्टेशनवर ड्युटी साठी आलेले १५ ते २० गार्डही जमा झाले होते. यानंतर जीआरपी पोलिसांनी रेल्वे पोलिसासह गाडीतील दोन्ही गार्ड कर्मचार्यांना ताब्यात घेऊन गाडी मुंबईच्या दिशेने मार्गस्थ केली. तर या ठिकाणी गार्ड कर्मचार्यांनी ठिय्या मांडत आपला निषेध व्यक्त केला.
तर, जनता एक्सप्रेस मध्ये सुरक्षारक्षकांमध्ये झालेली वादाची घटना खरी आहे ही तक्रार खंडवा स्टेशनकडे वर्ग केली असल्याची माहिती भुसावळ लोहमार्गचे वरिष्ठ निरिक्षक विजय घेरडे यांनी दिली आहे.