सहा गावांसाठी हतनूरमधून पाण्याचे आवर्तन, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे निर्देश

जळगाव, प्रतिनिधी । ममुराबादसह परिसरातील पाच गावांना पाणी टंचाई उदभवू नये यासाठी हतनूर धरणातून बिगर कृषक कामासाठी आवर्तन सोडण्याचे निर्देश पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. यामुळे या परिसरातील ग्रामस्थांना दिलासा मिळाला असून त्यांनी पालकमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

याबाबत माहिती अशी  की,  ममुराबाद, विदगाव, आवार, खापरखेडा, तुरखेडा आणि नांद्रा खुर्द या गावांना पाण्याची टंचाई जाणवू नये यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी गत वर्षी हतनूर धरणातून पाण्याचे आवर्तन सोडले होते. यामुळे या भागात टंचाई जाणवली नव्हती. दरम्यान, यंदा देखील टंचाईचे सावट भासू नये यासाठी या सहा गावांचे सरपंच तसेच मान्यवरांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना साकडे घातले होते. या अनुषंगाने आता हतनूर धरणातून या सहा गावांसाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार आहे.

 

परिसरात असलेल्या कालव्यांच्या मदतीने हे पाणी या सहा गावच्या ग्रामस्थांची तहान भागविणार आहे. यामुळे कडाक्याच्या उन्हाळ्यातही ग्रामस्थांना पाणी टंचाई भासणार नाही. या आवर्तनात हतनूर धरणातून साधारणतः तीन दशलक्ष घनमीटर इतके पाणी त्वरित सोडण्याचे आदेश पालकमंत्री महोदयांनी दिलेले आहेत. सदर पाणी सोडण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी अधीक्षक अभियंता व प्रशासक क.डा.जळगाव श्री. दळवी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून संबंधित कार्यकारी अभियंता यांना पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत.

पाण्याचे आवर्तन सोडण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, उपविभागीय अभियंता शशिकांत चौधरी, उप अभियंता पाटबंधारे विभाग तसेच कार्यकारी अभियंता श्री. भैरी  यांचे सहकार्य लाभले आहे. तर या आवर्तनामुळे पाणी टंचाई भासणार नसल्याने परिसरातील ग्रामस्थांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे आभार मानले आहेत.

Protected Content