बिहारमध्ये चुरशीची लढत; एनडीएला धक्का बसण्याची शक्यता

पटणा । बिहारमध्ये आज शेवटच्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर विविध संस्थांनी जाहीर केलेल्या एक्झीट पोल नुसार सत्ताधारी एनडीएला धक्का बसण्याचे दर्शविण्यात आले असून राजद व काँग्रेसच्या महाआघाडीच्या जागा वाढणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. एक्झिट पोलनुसार बिहार विधानसभेत त्रिशंकू स्थिती निर्माण होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाआघाडीला १२० जागा मिळतील. तर एनडीएला ११६ जागा मिळणार असल्याचा अंदाज सी व्होटरने व्यक्त केला आहे. आरजेडी बिहारमधील सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येईल, असा अंदाज जन की बात एक्झिट पोलने व्यक्त केला आहे. इंडिया टुडे- माय एक्झिट पोलनुसार, बिहारचे मुख्यमंत्री म्हणून तेजस्वी यादव यांना ४४ टक्के, नितीशकुमार ३५ टक्के, चिराग पासवान यांना ७ टक्के संधी आहे.

तिसर्‍या टप्प्यात प्रस्थापित पक्षांशिवाय उपेंद्र कुशवाह यांच्या आरएलएसपी व ओवैसी यांच्या एमआयएम आघाडीची कसोटी लागली आहे. कुशवाह-ओेवैसी यांच्या आघाडीत मायावती यांचा बसप व माजी खासदार पप्पू यादव यांचा जनअधिकार पक्षही सामील आहे. 2015 च्या निवडणुकीवेळी 78 जागांपैकी तब्बल 58 जागा महागठबंधनने जिंकल्या होत्या; पण त्यावेळच्या निवडणुकीत संयुक्त जनता दल हा महागठबंधनमध्ये सामील होता. त्यावेळी रालोआमध्ये भाजप, लोकजनशक्ती पार्टी, कुशवाह यांचा पक्ष तसेच जितनराम मांझी याचा हम पक्ष सामील होते. त्यावेळी आघाडीला 78 पैकी केवळ 24 जागा जिंकता आल्या होत्या.

Protected Content