मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतकऱ्यांना दिवसा कृषी पंपांसाठी वीज पुरवठा करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० च्या प्रभावी अंमलबजावणीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत ऊर्जा विभागातील अधिकारी, जिल्हाधिकारी आणि संबंधित कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित उच्चस्तरीय आढावा बैठकीत अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डिकर, राज्याच्या अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्यासह महसूल, ग्रामविकास आणि मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी योजनेच्या अधिक गतीमान अंमलबजावणीसाठी तयार करण्यात आलेल्या सिंगल विंडो पोर्टलचे उद्घाटन केले. त्यांनी योजनेतील प्रशासकीय आणि तांत्रिक अडचणींचा आढावा घेऊन त्या प्राधान्याने दूर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, अचूक धोरण आणि निश्चित अंमलबजावणी असल्यास सरकारी योजनाही वेळेत पूर्ण होऊ शकतात, याचे हे उत्तम उदाहरण आहे. या योजनेअंतर्गत राज्यात विविध ठिकाणी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारले जात असून, त्यांच्या माध्यमातून कृषी फीडर चालवले जाणार आहेत. आतापर्यंत राज्यात १३५९ मेगावॅट क्षमतेचे प्रकल्प पूर्ण झाले असून, २ लाख १४ हजार शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळू लागली आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत १५,२८४ मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर आहे. एकूण १६ हजार मेगावॅट क्षमतेचा हा जगातील सर्वात मोठा विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्प आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना केवळ दिवसा वीज पुरवठा करण्याची मागणी पूर्ण होणार असून, सप्टेंबर २०२६ पर्यंत याची अंमलबजावणी पूर्ण होईल.

या योजनेत सुमारे ६५ हजार कोटी रुपयांची खाजगी गुंतवणूक होणार असून, ग्रामीण भागात ७० हजार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. महावितरणला सरासरी तीन रुपये प्रति युनिट दराने वीज उपलब्ध होणार असल्याने, कृषी पंपांना मोफत वीज देण्यासाठी राज्य सरकारला येणाऱ्या अनुदानात मोठी बचत होणार आहे. तसेच, उद्योगांवरील क्रॉस सबसिडीचा भार कमी होणार आहे. केंद्र सरकारनेही या योजनेची प्रशंसा करून इतर राज्यांना याचे अनुकरण करण्यास सांगितले आहे. या योजनेसाठी महावितरणला राष्ट्रीय स्तरावर सुमारे २० पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

Protected Content