पोकरा योजनेचे अनुदान जमा करा, अन्यथा कार्यालयात टाळे ठोकणार : खा. पाटील

चाळीसगाव प्रतिनिधी | नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) यंोजनेचे थकीत अनुदान शेतकर्‍यांच्या खात्यावर ५ फेब्रुवारीपर्यंत जमा करावे. अन्यथा शेतकर्‍यांसोबत आपल्या कार्यालयाला घेराव घालू व टाळे ठोकू, असा इशारा खासदार उन्मेष पाटील यांनी पोकरा प्रकल्प संचालकांना पत्राद्वारे दिला आहे.

या संदर्भात जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ही योजना शेतकर्‍यांच्या दृष्टीने अतिशय वरदान ठरली आहे. मात्र या योजनेबाबत शेतकर्‍यांसमवेत चर्चा करत असताना असे निदर्शनास आले की, शेतकरी व शेतकरी गटांना दिलेल्या लाभाचे अनुदान मागील ४ ते ५ महिन्यांपासून (डेस्क – ७) मुंबई स्तरावर प्रलंबित आहेत. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. जळगाव जिल्ह्याची १७ जानेवारी अखेर स्थिती पाहता ६ हजार ४३० शेतकर्‍यांचे ४४ कोटी ६८ लाखांचे अनुदान प्रलंबित आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत.

यात पुढे म्हटले आहे की, याबाबत आपणास कळवले होते. तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव यांना २७ डिसेंबर २०२१ रोजी घेराव घालून या विषयाबाबत चर्चाही केली होती. यावेळी आपणासोबत भ्रणध्वनीद्वारे चर्चा केली असता आपण मला आश्वासन दिले होते की, २० जानेवारीपर्यंत सदर अनुदान शेतकरी व शेतकरी गटांच्या खात्यात जमा करण्यात येईल, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. परंतु २० रोजी मी माहिती घेतली असता कुठलेही अनुदान शेतकर्‍यांच्या खात्यात जमा झालेले नाही. त्यामुळे येत्या ५ फेब्रुवारी पर्यंत सदर अनुदान शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होण्याकरिता प्रयत्न करावे. ते जमा न झाल्यास मी स्वतः जिल्ह्यातील शेतकर्‍यांसमवेत आपल्या कार्यालयास घेराव घालून टाळे ठोकेल.त्यामुळे आपण या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ कारवाई करावी. अशी मागणी खासदार उन्मेष पाटील केली आहे. या पत्राच्या प्रती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनाही कार्यवाहीसाठी दिली. जिल्ह्यातील एकूण ६ हजार ४३० शेतकर्‍यांची प्रलंबित रक्कम तातडीने देण्याची मागणी खासदार पाटील यांनी केली आहे.

Protected Content