चाळीसगाव प्रतिनिधी । केंद्र सरकार विरोधी पक्षाची सरकारे असणार्या राज्यांमध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत काँग्रेसने याबाबत निवेदनाद्वारे निषेध व्यक्त केला आहे.
येथील काँग्रेस समितीने आज नायब तहसीलदारांना निवेदन दिले. यात नमूद केले आहे की, केंद्रातील मोदी सरकार ज्या राज्यात विरोधी पक्षांची सरकारे आहेत तेथे हे राजकीय अस्थिरता निर्माण करून ती सरकारी पाडण्याचा खेळ सुरू केला आहे. गोवा ,कर्नाटक ,मध्य प्रदेश, व आता राजस्थान येथे हा खेळ सुरू केला आहे. अशा प्रकारे देशातील समृद्ध अशा लोकशाहीचा पायाच खिळखिळा करण्याचा प्रयोग हे भाजपप्रणीत केंद्राचे सरकार करीत आहे. राजस्थानचे राज्यपाल माननीय कलराज मिश्रा यांनी तातडीने राजस्थान विधानसभेचे अधिवेशन बोलावून तेथे बहुमत चाचणी घ्यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
चाळीसगाव तालुका व शहर काँग्रेस,व सेवादलाच्या वतीने चाळीसगाव येथील नायब तहसीलदार विशाल सोनवणे यांना हे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी तालुकाध्यक्ष अनिल निकम, शहराध्यक्ष देवेंद्र पाटील ,तालुका सेवादल अध्यक्ष रमेश चौधरी, माजी आमदार ईश्वर जाधव, रमेश शिंपी, मंगेश अग्रवाल, प्रदीप देशमुख, सुनील राजपूत, नितीन सूर्यवंशी, पंकज शिरोडे, अॅड. संदीप सोनार, कमलेश येवले यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.