चाळीसगाव प्रतिनिधी । शहरात श्रीमती चंपाबाई राम रतन कलंत्री प्राथमिक विद्यालय व श्रीमती सरस्वती बाई आवटे प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आज वृक्षदिंडी काढत ‘पाणी वाचवा, पाणी जिरवा’ असा संदेश दिला.
यावेळी, आजच्या परिस्थितीत भूजल पातळीत झालेले प्रचंड कमतरता पहाता भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेऊन रूफ वॉटर हार्वेस्टिंगद्वारे आपल्या छतावरील पाणी जिरवण्याचा संदेश देण्यात आला. शहरातील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ तथा चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे संचालक डॉ. सुनील राजपूत यांच्या संकल्पनेतून येथील न्यायालयातील न्यायाधीश एल.एस.पहाडेन, ए.एस.भसारकर, जी.व्ही.गांधी, एम.व्ही.भागवत यांना वृक्ष देऊन दिंडीचे पूजन करण्यात आले. यावेळी वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश ल.मु.पाटील यांनी या दिंडीत खांदा देऊन वृक्षदिंडीची सुरुवात केली. संपूर्ण शहरातून ‘पाणी वाचवा-पाणी जिरवा, वृक्ष लावा-वृक्ष वाचवा’, ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी’ अशा विविध घोषणा देत बालगोपालांनी शहर गजवून सोडले. यावेळी डॉ. सुनील राजपूत हे स्वतःत्यांच्या सहकार्यांसह दिंडीमध्ये माहितीपत्रक वाटत नागरिकांना माहिती देत होते. दिंडीचे पूजनाच्या वेळी चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन नारायण अग्रवाल, सचिव डॉ. विनोद कोतकर, संचालक क.मा.राजपूत, मिलिंद देशमुख, बार असोशियनचे अध्यक्ष ॲड. पुष्कर कुलकर्णी, ॲड. रणजीत पाटील, राहुल जाधव, विजय पाटील, सुभाष पवार आदी उपस्थित होते.या दिंडीत श्रीमती चंपाबाई राम रतन कलंत्री प्राथमिक विद्यालय व श्रीमती सरस्वती बाई आवटे प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता.