यावल- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चिंचोली-धानोरा मार्गावर झाला असून, कार थेट रस्त्यावर कोसळलेल्या निंबाच्या झाडावर आदळली असून यात चार जण जखमी झाले आहेत.
तालुक्यातील बुऱ्हाणपूर-अंकलेश्वर राज्य महामार्गावर चिंचोलीजवळ एक भीषण अपघात घडला असून, यामध्ये चार जण जखमी झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी, ३ मे रोजी रात्री अडीच ते तीन वाजेच्या सुमारास घडला. गुजरातकडून भुसावळकडे जाणाऱ्या हुंडाई चारचाकी वाहनाचा (क्रमांक GJ-05-JE-8071) मोठ्या निंबाच्या झाडावर धडकून अपघात झाला. संबंधित मंडळी भुसावळ येथे एका लग्न समारंभासाठी जात होती.
अपघात चिंचोली-धानोरा मार्गावर झाला असून, कार थेट रस्त्यावर कोसळलेल्या निंबाच्या झाडावर आदळली. झाड एवढे मोठे होते की वाहन पूर्णपणे त्यात अडकून गेले. या भीषण अपघातात कारमधील चार व्यक्ती जखमी झाल्या असून, त्यातील एका व्यक्तीस गंभीर दुखापत झाली आहे. ही व्यक्ती कार चालकाच्या शेजारी बसलेली होती. सर्व जखमी गुजरात राज्यातील रहिवासी असल्याचे प्राथमिक चौकशीतून स्पष्ट झाले आहे.
अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करत, जखमींना उपचारासाठी तात्काळ जळगाव येथे हलवले. सुदैवाने तातडीने वैद्यकीय मदत मिळाल्यामुळे संभाव्य जीवितहानी टळली.
दरम्यान, या अपघातामुळे राज्य महामार्गावर सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रस्त्याच्या कडेला असलेली जिवंत, पण झुकलेली किंवा धोकादायक झाडे वेळेवर कापली जात नाहीत, हेच या अपघातातून दिसून येते. मोठे, जिवंत निंबाचे झाड रस्त्यावर कसे पडले, याबाबत सध्या अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या घटनेमुळे प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या घटनेमुळे पुन्हा एकदा महामार्ग सुरक्षेचे गांभीर्य अधोरेखित झाले आहे. जिवंत झाडांचा योग्यवेळी आढावा न घेतल्यामुळे निष्पाप प्रवाशांचे जीव धोक्यात येत आहेत. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.