भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांच्या गटावर झालेल्या अमानवी दहशतवादी हल्ल्याचा भुसावळ शहरात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. या पार्श्वभूमीवर शहरातील हिंदू-मुस्लीम नागरिकांनी एकत्र येत एकतेचा संदेश देणारा कॅन्डल मार्च काढला. विविध समाजघटकांच्या सहभागातून निघालेल्या या शांततेच्या मोर्च्याने शहरवासीयांचे लक्ष वेधले.
२२ एप्रिल रोजी जम्मू-कश्मीरच्या पहलगाम भागातील एका रिसॉर्टमध्ये ४० पर्यटकांच्या गटावर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला होता. या क्रूर हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. या अत्यंत वेदनादायक आणि निंदनीय घटनेच्या निषेधार्थ भुसावळ शहरात माजी नगरसेवक शेख पापा शेख कालू यांच्या नेतृत्वाखाली शांततेचा कॅन्डल मार्च काढण्यात आला.
शुक्रवार दिनांक २ मे रोजी सायंकाळी सहा वाजता पापा नगर येथून कॅन्डल मार्चला प्रारंभ झाला. यामध्ये शहरातील हिंदू आणि मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मार्च शनिमंदिर, वाडा, गांधी चौक, सराफ बाजार, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातून मार्गक्रमण करत संपूर्ण शांततेत संपन्न झाला.
मोर्चादरम्यान कोणताही घोष वा उन्माद नव्हता, तर प्रत्येकाच्या हाती मेणबत्त्या होत्या आणि चेहऱ्यावर हल्ल्याविरुद्धचा संताप स्पष्ट दिसत होता. या कॅन्डल मार्चने समाजात धार्मिक एकतेचा आणि शांततेचा संदेश दिला. या प्रकारचे दहशतवादी हल्ले केवळ माणुसकीचा अपमान आहेत आणि त्याविरोधात देश एकवटून उभा आहे, हे या उपक्रमातून अधोरेखित झाले.
हल्ल्यात बळी गेलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहत उपस्थितांनी ‘आतंकवादाचा कठोर निषेध’ आणि ‘राष्ट्रीय एकात्मतेचा जागर’ केला. शेख पापा शेख कालू यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी जात, धर्म, पंथ विसरून शांततेच्या मार्गाने आपली एकजूट दाखवली. या कॅन्डल मार्चमधून भुसावळकरांनी एकता आणि शांतीचा दीप उजळवत, देशातील कोणत्याही प्रकारच्या दहशतीला विरोधाचा प्रकाश दिला.