मुंबई (वृत्तसंस्था)। पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानशी वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये खेळू नये, अशी देशवासियांची भावना आहे. त्यानंतर बी.सी.सी.आय.ने आम्ही पाकिस्तानशी वर्ल्ड कपमध्ये सरकारच्या परवानगीशिवाय खेळू शकत नाही, असे आय.सी.सी.ला कळवले होते. पण आय.सी.सी.ने याबाबत आपले मत मांडताना म्हटले की, “आयसीसी स्वत: कोणत्याही देशावर बहिष्कार टाकू शकत नाही. कारण हे निर्णय सरकार घेऊ शकते. हे माहिती असतानाही बीसीसीआयने आम्हाला याबाबत विचारणा केली होती, पण हा निर्णय घेणे आमच्या हातामध्ये नाही.”
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनेही यावर मत व्यक्त केलं आहे. पाकिस्तानवर वर्ल्ड कप स्पर्धेत बंदी घालावी, यासाठी आयसीसीला राजी करणं ही सोपी गोष्ट नाही, असे गांगुली म्हणाला. बीसीसीआयच्या या मागणीला आयसीसीकडून परवानगी मिळण्याची एक टक्काही शक्यता नाही, असेही त्याने म्हटले आहे.