अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील दहिवद येथील ४० वर्षीय तरुणाने शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून दैवत शिवारातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीला आली. या संदर्भात आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी एकावर अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप उर्फ सुरेश भालेराव देसले (वय-४०, रा. दहिवद ता. अमळनेर) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मयत दिलीप उर्फ सुरेश भालेराव देसले हा अमळनेर तालुक्यातील दहिवद येथे वास्तव्याला आहे. त्याचे गावातील एका महिलेसोबत गेल्या चार महिन्यांपासून प्रेम संबंध होते. त्यामुळे गावात राहणारा हिम्मत प्रभाकर पाटील याला त्याचे वाईट वाटले. त्यामुळे त्यांनी दिलीप देसले याची गावात बदनामी करून शिवीगाळ केली, व त्रास देणे सुरुवात केले. दरम्यान या मानसिक त्रासाला कंटाळून दिलीप देसले यांनी दहिवद गावातील भिला माळी यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवार २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता उघडकीला आले. दरम्यान नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून हिम्मत प्रभाकर पाटील वय-४०, रा. दहिवद ता. अमळनेर यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भैय्यासाहेब देशमुख हे करीत आहे.