Breaking : बारावीत कमी गुण, ऋषिकेशने घेतला आयुष्याचा शेवटचा निर्णय !

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बारावीच्या परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने आलेल्या तीव्र नैराश्यातून जळगाव तालुक्यातील ममुराबाद गावात एका १७ वर्षीय विद्यार्थ्याने राहत्या घराच्या वरच्या (दुसऱ्या) मजल्यावर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना सोमवारी ५ मे रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. गेल्या दोन दिवसांतील जळगाव जिल्ह्यातील ही १२ वी निकालामुळे घडलेली दुसरी आत्महत्या असून, या घटनेने पालक आणि शिक्षण क्षेत्रांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. आजच एरंडोल तालुक्यातील एका विद्यार्थ्याने पाचोरा येथे बहिणीच्या घरी त्याने कमी गुण मिळाल्याने आत्महत्या केली होती.

ऋषिकेश दिनेश पाटील (वय १७ वर्ष), रा. ममुराबाद, ता. जि. जळगाव, हा तरुण आपल्या आई-वडील, आजी आणि मोठ्या भावासोबत ममुराबाद येथे वास्तव्याला होता. त्याने विज्ञान शाखेतून बारावीची परीक्षा दिली होती. आज, सोमवार, ५ मे रोजी दुपारी एक वाजता बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला. या निकालात ऋषिकेश पाटील याला ४९ टक्के असे कमी गुण मिळाले. मिळालेले गुण त्याच्या अपेक्षेपेक्षा खूपच कमी असल्याने त्याला तीव्र नैराश्य आला. या नैराश्यातूनच त्याने राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावर कोणी नसताना गळफास घेऊन आपली जीवनयात्रा अकालीच संपवली. दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही दुर्देवी घटना आईच्या लक्षात आली.

ही दुर्देवी घटना घडल्यानंतर ऋषिकेशच्या आई-वडिलांनी जळगाव जिल्हा रुग्णालयात जो आक्रोश केला, तो काळजाला चिरणारा होता. त्यांच्या दुःखाने उपस्थितांचे डोळे पाणावले. ऋषिकेशचा मोठा भाऊ फार्मसी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. या घटनेमुळे संपूर्ण पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, ममुराबाद गावात शोककळा पसरली आहे. दरम्यान, या घटनेसंदर्भात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांसह मित्रपरिवाराने मोठी गर्दी केली होती. विद्यार्थ्यांच्या मनात निकालाच्या गुणांपेक्षा जीवन अधिक महत्त्वाचे आहे, हा संदेश पुन्हा एकदा या दोन घटनांनी अधोरेखित केला आहे.

Protected Content