राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी भाजपचे २९ रोजी घंटानाद आंदोलन

मुंबई प्रतिनिधी । राज्यातील मंदिरे उघडण्यात यावी या मागणीसाठी भारतीय जनता पक्ष २९ रोजी राज्यव्यापी घंटानाद आंदोलन करणार असल्याची माहिती आज पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आ. रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे.

भारतीय जनता पार्टी अध्यात्मिक प्रकोष्ठच्याच्या माध्यमातून देवालये पूर्ववत देवदर्शनासाठी सुरु करण्यासाठी संघर्ष करणार आहे. त्याचाच भाग म्हणून शनिवार, २९ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात गावोगावी खेडोपाडी शहरात नगरात जोरदार घंटानाद आंदोलन करणार आहे. भाविकांनी उपस्थित राहून सहभाग घ्यावा आणि झोपलेल्या सरकारला जागे करूया असे आवाहन पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, आमदार रवींद्र चव्हाण यांनी केले आहे.

या संदर्भात जारी केलेल्या पत्रकार आ. चव्हाण यांनी म्हटले आहे की, गुढी पाडवा नववर्ष स्वागत यात्रा नाही. सगळ्यानी निमूटपणे स्वीकारलं आणि पाडवा घरीच केला. रामनवमीला श्रीरामाचे मुखदर्शन नाही. हनुमान जयंतीला बजरंगबलीच्या चरणस्पर्शाला पारखे झालो,अंतर राखलं. महिलांनी वट पौर्णिमेचा व्रत घरातूनच जपलं. चातुर्मास सुरु झाला.आषाढी एकादशीला ठोबाच्या दर्शनाला आतुर झालो, अजून नको अंतर राखा. म्हणून माऊलीला मनातूनच दंडवत घातला. गुरुपौर्णिमेला दत्तगुरूंना साष्टांग नमस्कार राहूनच गेला.

पवित्र श्रावण महिना आला, आणि गेला. श्रावणी सोमवारी शिवशंकराच्या पिंडीवर बेलपत्री वाहिलीच नाही. दहीहंडीच्या उत्सहाला मुरड घातली.गणपती बाप्पा आले. आता गौरी पूजनही संपन्न झाले. पण आता पुरे झाले. राज्य सरकारने आता बासच करावे. भक्तांना देवदर्शनाची आस लागली आहे. लवकरात लवकर देवालय सुरु करावी यासाठी आंदोलन करण्यात येणार असल्याचे या पत्रकात म्हटले आहे.

Protected Content