अर्णबच्या लीक झालेल्या व्हाटसअ‍ॅप चॅटबाबत भाजपने स्पष्टीकरण द्यावे -सचिन सावंत

मुंबई प्रतिनिधी । सोशल मीडियात बीएआरसीचे माजी प्रमुख दास गुप्ता आणि रिपब्लिक चॅनलचे प्रमुख अर्णव गोस्वामी यांचे व्हाटसअ‍ॅपवरील चॅट व्हायरल झालेले आहेत. हे अत्यंत धक्कादायक असून त्यामधून टिआरपी घोटाळ्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि मोदी सरकारचा हात असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यासंदर्भात भाजपने तात्काळ स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलेली आहे. 

यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले की मुंबई पोलिसांनी टिआरपी घोटाळा उघडकीस आणला असून त्यामध्ये रिपब्लीक चॅनलची चौकशी चालू आहे. त्याचबरोबर बीएआरसीचे पूर्व प्रमुख पार्थो दास गुप्ता यांना अटकही करण्यात आलेली आहे. संबंधीत घोटाळा दाबण्याचा प्रयत्न मोदी सरकारकडून झाला असून त्याकरता उत्तरप्रदेशमध्ये वेगळी केस नोंदवण्याचा प्रकार देखील घडला. हा सगळा आटापिटा आपलं कारस्थान उघड पडेल या हेतून होता, हे व्हाटसअ‍ॅप चॅट वरून दिसून येत आहे. या चॅट मधून रिपब्लिक चॅनेलचे प्रमुख आपली पंतप्रधान कार्यालय, माहिती आणि जनसंपर्क मंत्रालय आणि एएस यांच्याशी जवळीक असल्याचे सांगत असल्याचे दिसून येते. त्याचबरोबर केंद्र सरकारशी संबंध असल्याने हे दोन्ही व्यक्ती रिपब्लिक चॅनलच्या टिआरपी मध्ये वाढ होण्याची व्यूव्हरचना तयार करत होते, हे ही दिसून येते. यामध्ये एएस नावाची व्यक्ती कोण आहे, हे भाजपने स्पष्ट करण्याची गरज आहे. तसेच रिपब्लिक चॅनलबद्दल माहिती जनसंपर्क मंत्रालयाला मिळालेली तक्रार बाजूला ठेवण्यात आली आहे, असे मंत्री राजवर्धन सिंग राठोड यांनी सांगितले, असे यात नमूद करण्यात आलेले आहे याचाच अर्थ रिपब्लिक चॅनलला वाचविण्याचे प्रयत्न केंद्र सरकार करत होते हे स्पष्ट आहे. 

सचिन सावंत यांनी पुढे म्हटले की, या कालावधीमध्ये प्रेक्षकांची गोपनिय स्वरुपाची माहिती उघड करण्यात आली, हे ही दिसून येते. त्यामुळे हे प्रकरण अत्यंत धक्कादायक आहे. टिआरपी घोटाळ्यामध्ये केंद्र सरकारचा काय संबंध आहे? किरीट सोमय्या व राम कदमांसहित भाजपाचे नेते रिपब्लीक चॅनेलच्या प्रमुखाच्या पाठीशी का उभे राहिले? व या कारस्थानामध्ये भाजपची काय भूमिका आहे हे स्पष्ट होणे गरजेचे आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी पोहचतीलाच अशी अपेक्षा यावेळी सचिन सावंत यांनी व्यक्त केली.

 

Protected Content