भाजप -शिवसेनेच्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी संयम बाळगावा – विकास पाटील

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । माझं भाजप – शिवसेनेच्या नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे की, त्यांनी शांतता व संयम बाळगावा, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक विकास पाटील यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे व्यक्त केले आहे.

सध्या पाचोरा शहर व तालुक्यातील वेगवेगळ्या प्रश्नांसाठी वेगवेगळी आंदोलने होत आहेत. मात्र दुर्दैवाने ही सर्व आंदोलने जनतेसाठी न होता केवळ दिखाऊपणा आणि शिवराळ भाषेत होत असल्याचे दिसते. यात भाजप नेते व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते व नंतर शिवसेना नेते व पदाधिकारी व कार्यकर्ते असा सामना बघायला मिळत आहे. अत्यंत खालच्या पातळीत नेते व पदाधिकारी यात बोलतांना दिसत आहेत. मुळात आपल्या पाचोरा तालुक्याची संस्कृती व संस्कार हे शांतता, संयम, व विकासासाठी राजकारण करणाऱ्या कै. के. एम. (बापु) पाटील, कै.  ओंकार (आप्पा) वाघ, कै. आर. ओ. (तात्या) पाटील, कै. सुपडू भादू पाटील यांच्या वारसा आपण आजही अभिमानाने सांगत असतो.

आजपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाने व नेत्यांनी जनआंदोलन करतांना हे सरकारच्या विरुद्ध करून तालुक्यातील शासकीय अधिकारी कसे धाकात राहतील व जनतेची कामे करतील असेच काम केले आहेत. मात्र आज सर्व तालुक्यातील जनता उघड्या डोळ्यांनी बघतांना दिसत आहे. दोष कोणाचा ? सुरुवात कोणी केली ? हे बघण्यापेक्षा जनतेचे प्रश्न योग्य वेळी सोडवणे हे महत्त्वाचे आहे. या अशा राजकीय वादामुळे मूळ प्रश्न बाजूला राहत असून तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी जनतेच्या कामापेक्षा इतर सर्व कामांमध्ये सहभागी होतांना दिसत आहे. राजकीय नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांचा तालुक्यातील वचक संपण्याच्या मार्गावर आहे.

अशा पद्धतीने राजकारण करून आपण काय मिळवणार आहोत. याचही आत्मपरीक्षण आपण करणे गरजेचे आहे. आणि विशेष म्हणजे जे लोकप्रतिनिधी आहेत ज्यांना लोकांनी निवडून दिले ते लोक सुध्दा कसे बोलतात हे जनता बघत आहे. आपला पक्ष त्याची विचारधारा काय आहे हे सांगणे गरजेचे आहे. प्रश्न, समस्या, आंदोलने जनतेसाठी अत्यावश्यक आहे. पण त्या सगळ्यांचा वापर सरकारी यंत्रणांवर वचक निर्माण करून जनतेच्या कामांसाठी व्हावा अस माझं व माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्पष्ट मत आहे.

जनतेचे असंख्य प्रश्न असतांना आपण आपल्या तालुक्यात कोणती राजकीय संस्कृती रुजवत आहोत. याचा विचार ह्या दोघे राजकीय पक्ष नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी करणे अत्यंत गरजेचे आहे. आपण कोणता राजकीय वारसा घेऊन चालणार आहोत. राडा ही आपल्या तालुक्यातील राजकीय संस्कृती मुळीच नाही. मात्र शेतकऱ्यांसाठी त्यांच्या प्रश्नांसाठी शिंगाडे मोर्चा हीच आपली खरी संस्कृती आहे. पण ती ही कोणत्या राजकीय पक्षाच्या विरोधात नसून सरकारी धोरणाच्या विरोधात आहे. तसेच शांतपणे या तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचे धरणे, जलसाठे, वाढवणे ही आपली ओळख आहे.

पाचोरा तालुक्याची ओळख ही सर्वात जास्त जलसिंचन प्रकल्प, कृषी उत्पन्न बाजार समिती, शेतकरी सहकारी संघ, निर्मल सिड्स, नवीन बस स्थानक, रेल्वे स्टेशन, खत कारखाना, नवीन शैक्षणिक प्रकल्प, आणि सुसंस्कृत कष्टकरी माणूस हीच आहे आणि असावी. येणाऱ्या काळात आपल्या तालुक्यातील जनतेसाठी मोठे औद्योगिक प्रकल्प, शेतीसाठी पाणी, युवकांना रोजगार, महिलांना रोजगार हे जिव्हाळ्याचे प्रश्न असतांना आपण कोणत्या दिशेने जात आहोत याचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.

विकास कामाचे राजकरण झाले पाहिजे ना की आपण किती शिव्या देतो किती खालच्या पातळीवर बोलतो याचे नको! जनतेचे प्रश्न, समस्या समजून त्या सोडवण्यासाठी राजकारण करावं. विधायक, विकासासाठी एकत्र बसावं, जनतेच्या प्रश्नांवर लढावं. आपल्या समोर, आपल्या तालुक्यासमोर, जनतेसमोर अनेक प्रश्न असून आपण ते सोडवण्यासाठी प्राधान्य द्यावे. माझी या दोघा पक्षांना नेत्यांना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन वजा विनंती आहे की, त्यांनी संयम ठेवावा. तालुक्यात व शहरात वातावरण खराब होऊ नये अशा पद्ध्तीने वागावे, बोलावे. विकासासाठी राजकारण करावे. शांतता, संयम, ठेवावा. जनता सर्व बघत आहे. तालुक्यातील पुढील पिढ्यांना आपण काय विचार वारसा देणार आहोत. राजकारण चांगलं की वाईट ? हे जनतेच्या मनात निर्माण करण्याची जबाबदारी आपली आहे. असो !. माझं भाजप – शिवसेनेच्या नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे. शांतता व संयम ठेवावा. असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक विकास पाटील यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे व्यक्त केले आहे.

 

Protected Content