भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ रविवारी रात्री झालेल्या गोळीबारात रविवारी रात्री पाच जणांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेची सीआयडी मार्फत चौकशी करण्याची मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. अंत्ययात्रेसमयी जलसंपदा मंत्री व पालकमंत्री गिरीश महाजन यांची देखील उपस्थिती होती.
भुसावळातील भाजपा नगरसेवक रवींद्र खरात, त्यांचा मुलगा रोहित उर्फ सोनू, मुलगा प्रेमसागर तसेच मोठे बंधू सुनील बाबूराव खरात (48) व खरात भावंडांचा मित्र सुमित संजय गजरे यांची रविवारी रात्री निर्घृण हत्या करण्यात आली होती. अंत्ययात्रेसमयी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भेट दिली.
याप्रसंगी संतप्त जमावाने व नातेवाईकांनी न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली. प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना रामदास आठवले यांनी ही घटना सूड बुद्धीतून झाली असल्याचे सांगत या घटनेतील आरोपींच्या मागे कुठल्या राजकीय पक्षाच्या व्यक्तीचा हात आहे का? या संदर्भात सीआयडी चौकशीची मागणी केली जाणार असल्याचे ते म्हणाले. अंत्ययात्रेत आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, रमेश मकासरे यांच्यासह शहरातील विविध नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.