



मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | जर सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या म्हणण्यानुसार कायदा केला व मराठा समाजाला आरक्षणाचा कायदा केला तर त्याला माझा विरोध आहे. मग सरकारने देखील परिणाम भोगायला तयार राहावे, असा थेट इशारा गुणरत्न सदावर्ते यांनी दिला आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारच्या वतीने उद्या (दि.20) फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात मराठा समाजाच्या आरक्षणावर सविस्तस चर्चा होऊन राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीने देण्यात आलेल्या सर्वेक्षण अहवालावरून मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देणारा कायदा पारित केला जाण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यावरून मराठा आरक्षणाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका करणारे व मराठा आरक्षणाला सातत्याने विरोध करणारे गुणरत्न सदावर्ते पुन्हा संतापले आहे.
गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, मला सरकारचा खूप राग आलेला आहे. मला राग याच्यासाठी आला आहे, या देशामध्ये 50 टक्के खुल्या वर्गासाठी जागा होत्या. मात्र, जरांगेंच्या म्हणण्यानुसार राज्यसरकार कोणताही कायदा निर्माण करत असेल तर हे अत्यंत चुकीचे आहे. कारण तो कायदा जरांगे कायदा नाही. त्या कायद्याचे नावच एससी, एसटी, एनटी, ओबीसी कायदा-2005 असे आहे. ते काही जरांगे कायदा नाही.
सदावर्ते पुढे म्हणतात की, मनोज जरांगे यांच्या म्हणण्यानुसार देखील सरकारने कायदा करू नये मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा देखील करू नये. जर सरकारने तसा कायदा केला तर तर त्याला संवैधानिक आधार कोणता आहे. एवढंच सांगतो की, मग सरकारने त्याचे परिणाम भोगायला देखील तयार राहावे, असा इशारा गुणरत्न सदावर्ते यांनी दिला आहे.



