बापरे : जळगावातून दोन सख्ख्या बहिणींना फूस लावून पळविले !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील गणेश कॉलनी परिसरातून नांद्रा येथील दोन सख्ख्या बहिणींना अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील नांद्रा येथील दोन बहिणी सोमवारी ५ सप्टेंबर रोजी सकाळी जळगावात कामाच्या निमित्ताने आलेल्या होत्या. यातील एक १५ वर्षाची तर मोठी बहिण ही १८ वर्षाची आहे. दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास गणेश कॉलनीतील एसएनडीटी महाविद्यालयाच्या समोरून रिक्षात बसल्या. दरम्यान, त्या रात्री उशीरापर्यंत घरीच परतल्या नसल्याने पालकांनी चिंता व्यक्त केली. त्यांनी दुसऱ्या दिवशी मंगळवारी ६ सप्टेंबर रोजी जळगाव शहरात येवून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. दोन्ही मुली बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलीसांनी गणेश कॉलनीतील एस.एन.डी.टी. महाविद्यालय परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्याचे काम सुरू केले आहे. याप्रकरणी दुपारी २ वाजता मुलींच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरेाधात गुन्हा दाखलकरण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र पवार करीत आहे.

Protected Content