विनायक मेटेंच्या नसत्या उठाठेवींनी मराठा आरक्षणावर बालंट – काँग्रेसचा गंभीर आरोप

नवी दिल्ली- विनायक मेटे यांच्यामुळे मराठा आरक्षणाच्या प्रकरणावर नसतं बालंट ओढवलं असतं. पण कोर्टाने त्यांची याचिका ऐकूनच न घेतल्यामुळे ते थोडक्यात वाचलं असा गंभीर आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

मराठा आरक्षणाच्या प्रकरणावरून सुप्रीम कोर्टात ला निकाल अजून आलेला नसला तरी त्या आधीच या प्रकरणावरून काँग्रेस विरुद्ध भाजप असे आरोप रंगत आहेत. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी दिल्लीत गेल्या तीन दिवसांपासून तळ ठोकून असलेल्या विनायक मेटेवर काँग्रेसने आज गंभीर आरोप केला आहे.

यासंदर्भात माहिती देताना काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले की, मराठा आरक्षणाचे प्रकरण घटनापीठाकडे सोपवण्याच्या मागणी संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना आ. विनायक मेटे यांच्या वतीने १०२ व्या घटना दुरूस्तीला आव्हान देणारी याचिका विचारात घेण्याची विनंती करण्यात आली. परंतु, या याचिकेचा आजच्या सुनावणीशी काहीही संबंध नसून, ही याचिका या प्रकरणाला जोडण्याची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली.

याविषयी सावंत पुढे म्हणाले की, १०२ व्या घटना दुरूस्तीसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात पुरेसा उहापोह झाला आहे. यावरून घेण्यात आलेले आक्षेप नाकारून उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण वैध ठरवले आहे. या पार्श्वभूमीवर मेटे यांनी या विषयावर याचिका दाखल करून ती मराठा आरक्षणाच्या प्रकरणाशी जोडण्याची मागणी म्हणजे मराठा आरक्षणाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न आहे.

मागील तीन दिवस आ. विनायक मेटे नवी दिल्लीत आहेत. त्यांनी नेमक्या कोणाच्या इशाऱ्यावरून आणि कोणत्या हेतूने मराठा आरक्षणविरोधी भूमिका घेतली, ते स्पष्ट केले पाहिजे. केवळ श्रेयवादासाठी ते हे उद्योग करत असतील तर त्यांनी आपली कोणती कृती आरक्षणाला पोषक ठरेल आणि कोणती मारक ठरेल, याचा सारासार विचार करावा, असेही खडे बोल सचिन सावंत यांनी सुनावले आहेत.

Protected Content